Tuesday, April 8, 2014

रामनवमी

रामनवमीचा उत्सव आज सर्व देशभर साजरा केला जात आहे. ह्या उत्सवाच्या तिथीची निश्चिति कशी झाली हे जाणण्याची मला उत्सुकता वाटली कारण कोठल्याहि घटनेचा इतका स्वच्छ कालनिर्णय आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये क्वचितच सापडतो आणि जेथे तो असतो तेथे त्याच्या खरेपणाबाबत अनेक शंका असतात असा आपला अनुभव आहे.  ह्या उत्सुकतेपोटी जालावर उपलब्ध असलेल्या रामायणसंहितांचा मी शोध घेतला.  त्यात मला जे दिसले ते पुढे लिहीत आहे.

ह्या संदर्भात शोधलेल्या संहिता दोन गटात पडतात.  पहिल्या गटाची प्रातिनिधिक संहिता म्हणून शास्त्री श्रीनिवास कट्टी मुधोळकर आणि सत्कारी मुखोपाध्याय संपादित 'Ramayana of Valmiki' ह्या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.  दिल्लीमध्ये १८८३ मध्ये छापलेले हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.   ह्या पुस्तकात रामजन्मासंदर्भात खालील श्लोक दिसतात:

ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः |
ततः च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ || १-१८-८
नक्षत्रेऽदितिदैवत्ये स्वोच्चसंस्थेषु पञ्चसु |
ग्रहेषु कर्कटे लग्ने वाक्पताविन्दुना सह || १-१८-९

http://www.valmikiramayan.net येथेहि हेच श्लोक दिसतात, यद्यपि तेथील संस्कृत अशुद्ध आहे

ह्या श्लोकांचे भाषान्तर मन्मथ नाथ दत्तकृत भाषान्तरानुसार
असे आहे:

"And then when the six seasons had rolled away after the completion of the sacrifice, in the twelfth month, on the nineth lunar day, under the Punarvasu asterism, when the Sun, the Moon, Saturn, Jupiter and Venus were at Arius, Capricorn, Libra, Cancer and Pisces, and when Jupiter had arisen with the Moon at Cancer, Kausalya gave birth to the lord of the universe..." (पृ.४९.)

’अध्यात्मरामायण’ नावाचा एक ग्रन्थ, मुनिलाल ह्यांनी भाषान्तरित केलेला, गीता प्रेस, गोरखपूर ह्यांनी छापला आहे.  मूळ रामायणाचा हा संक्षेप दिसतो.  त्यामधील पुढील श्लोक कमी शब्दात तेच तपशील देतो:

मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे।
पुनर्वस्वृक्षसहिते उच्चस्थे ग्रहपञ्चके॥
मेषं पूषणि संप्राप्ते... सर्ग ३, श्लोक १४,१५.

sacred-texts.com ह्या संस्थळामधील राल्फ टी.एच.ग्रिफिथकृत रामायणाचे भाषान्तर येथे आहे.   ह्या भाषान्तरामध्येहि वरील ग्रहस्थितीचे वर्णन दिले आहे.

Wikisource मधून घेतलेले आणि जनमानसावर मोठी पकड असलेले तुलसीदासाचे तुलसीरामायण असे म्हणते:

तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं। कौसल्यादि तहाँ चलि आई॥
अर्ध भाग कौसल्याहि दीन्हा। उभय भाग आधे कर कीन्हा॥
कैकेई कहँ नृप सो दयऊ। रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ॥
कौसल्या कैकेई हाथ धरि। दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि॥
एहि बिधि गर्भसहित सब नारी। भईं हृदयँ हरषित सुख भारी॥
जा दिन तें हरि गर्भहिं आए। सकल लोक सुख संपति छाए॥
मंदिर महँ सब राजहिं रानी। सोभा सील तेज की खानीं॥
सुख जुत कछुक काल चलि गयऊ। जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ॥
नौमी तिथि मधु मास पुनीता। सुकल पच्छ अभिजित हरिप्रीता॥
मध्यदिवस अति सीत न घामा। पावन काल लोक बिश्रामा॥
सीतल मंद सुरभि बह बाऊ। हरषित सुर संतन मन चाऊ॥
बन कुसुमित गिरिगन मनिआरा। स्त्रवहिं सकल सरिताऽमृतधारा॥
सो अवसर बिरंचि जब जाना। चले सकल सुर साजि बिमाना॥
गगन बिमल सकुल सुर जूथा। गावहिं गुन गंधर्ब बरूथा॥
बरषहिं सुमन सुअंजलि साजी। गहगहि गगन दुंदुभी बाजी॥
अस्तुति करहिं नाग मुनि देवा। बहुबिधि लावहिं निज निज सेवा॥

हा सर्व झाला एक गट.

दुसर्‍या गटात पडतात रामायणाच्या अशा आवृत्त्या ज्यांमध्ये रामजन्माच्या निश्चित वेळाविषयी अथवा तिथीविषयी कसलाच उल्लेख नाही.  ह्यामध्ये प्रामुख्याने पडते Baroda Oriental Institute ने निर्माण केलेली रामायणाची critical edition.  येथे उपलब्ध असलेल्या ह्या आवृत्तीमध्ये रामजन्माबाबत इतकेच म्हटले आहे:

कौसल्याजनयद्रामं दिव्यलक्षणसंयुतम्।
विष्णोरर्धं महाभागं पुत्रमिक्ष्वाकुनन्दनम्॥६॥
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा।
यथा वरेण देवानामदितिवज्रपाणिना॥७॥
भरतो नाम कैकेय्यां जज्ञे सत्यपराक्रम:।
साक्षाद्विष्णोश्चतुर्भाग: सर्वै: समुदितो गुणै:॥९॥
अथ लक्ष्मणशत्रुघ्नौ सुमित्राजनयत्सुतौ।
वीरौ सर्वास्त्रकुशलौ विष्णोरर्धसमन्वितौ॥१०॥

अर्थ: इक्ष्वाकुकुलनन्दन, भाग्यशाली, जणू विष्णूचा अर्धा भागच भासणार्‍या आणि दिव्य लक्षणांनी युत अशा पुत्राला कौसल्या जन्म देती झाली.  देवांमध्ये श्रेष्ठ अशा वज्रधारी इन्द्रामुळे जशी अदिती तशी कौसल्या अतितेजस्वी अशा पुत्रामुळे शोभून दिसली.  सर्व गुणांनी युक्त आणि विष्णूचा चतुर्भागच असा सत्यपराक्रम भरत कैकेयीपासून जन्मला.  सर्व अस्त्रांमध्ये कुशल आणि विष्णूच्या अर्ध्या अंशाने समन्वित अशा लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या दोघांना सुमित्रा जन्म देती झाली.

रामायणाची जी संस्कृत संहिता sacred-texts.com मध्ये येथे उपलब्ध आहे ती वर उल्लेखिलेल्या critical edition शी जुळते.

महाभारतातील खगोलविषयक उल्लेख कितपत सत्यस्थितिनिदर्शक मानावे ह्याबाबत शंकर बाळकृष्ण दीक्षितकृत ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या पुस्तकातील काही विधानांचा उपयोग होतो.  उदा. पृ. ११३ वर ते म्हणतात: "मेषादि संज्ञा भारतात कोठे आल्या नाहीत हे मागेच सांगितले आहे.  भारताच्या कोणत्याहि भागाच्या रचनाकाली त्या प्रचलित असत्या तर त्यांचा काही उल्लेख भारतात आल्यावाचून राहिला नसता, अशी सर्व भारत वाचणारांची खात्री झाल्यावाचून रहावयाची नाही.  तेव्हा भारतरचनाकाली मेषादि संज्ञा प्रचारात नव्हत्या.  तसेच क्रान्तिवृत्ताचे १२ विभाग करून ग्रहांची स्थिति सांगण्याची पद्धति भारतात नाही.  ग्रहांची व चन्द्राची स्थिति जेथे सांगितली आहे तेथे ती नक्षत्रांवर सांगितली आहे." रामायणात वर्णिलेला काल हा सर्वसंमतीने महाभारतातील वर्णिलेल्या कालाचा पूर्वीचा मानला जातो.  रामायण त्रेतायुगात घडले आणि भारतीय युद्धाच्या समाप्तीपासून कलियुग सुरू झाले अशी पारंपारिक श्रद्धा असते.  रामावतारहि कृष्णावताराच्या पूर्वीचा मानला जातो.  म्हणजेच महाभारतरचानाकालात जे ज्ञान नव्हते ते रामजन्माच्या वेळी निश्चितच नसणार.  तर मग रामाच्या जन्मासंबंधी ’अमुक ग्रह अमुक राशीत होता’ असले विधान, तसेच हा जन्म चैत्र महिन्यात झाला हे विधान निर्माणच कसे झाले?  रामजन्माच्या वेळी उपस्थित असलेला कोणीही नंतर बर्‍याच कालाअंती निर्माण होऊ घातलेल्या चैत्रादि संज्ञा, तसेच राशींचे उल्लेख कल्पून त्या कोठे नोंदवून ठेवू शकला नसता.  इतक्या प्राचीन काळात भारतीयांपाशी काही अन्य कालगणनेची आणि आकाशनिरीक्षणाची शिस्त होती असे कोठेच दिसलेले नाही

सारांश असा की आजच्या रामजन्माच्या कहाणीमागे सत्य काहीच दिसत नाही.  कानावर पडलेल्या परंपरा आणि तुलसीदासासारख्यांच्या लिखाणावर सश्रद्धांचा असलेला पूर्ण आणि अचिकित्सक विश्वास हेच तिचे आधार आहेत.