Thursday, December 26, 2013

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग ३.

चौरसाचे वर्तुल. चतुरस्रं मण्डलं चिकीर्षन्नक्ष्णयार्धं मध्यात्प्राचीमभ्यापातयेत्। यदतिशिष्यते तस्य सह तृतीयेन मण्डलं परिलिखेत्। बौधायन २.९ सरळ अर्थ - चौरसामधून वर्तुल करू इच्छिणार्‍याने (चौरसाच्या) कर्णाचा अर्धा भाग मध्यापासून (फिरवून) ’प्राची’ रेषेवर आणावा. त्याचा जो भाग (चौरसाच्या) बाहेर पडतो त्याच्या तिसर्‍या भागासह (कर्णाचा अर्धा भाग) घेऊन वर्तुल काढावे. (ते इष्ट वर्तुल आहे.)
टिप्पणी - शेजारच्या आकृतीमध्ये अबकड हा दिलेला चौरस आहे. अम हा त्याच्या कर्णाचा अर्धा भाग ’म’ बिंदूभोवती फिरवून उभ्या ’प्राची’ म्हणजे पूर्वपश्चिम रेषेवर मइ असा आणावा. तो आता अब ह्या बाजूस ’प’ येथे छेद देतो. पइ ह्या खंडावर ’फ’ बिंदु असा शोधावा की पफ = १/३ पइ. मफ ही त्रिज्या धरून काडलेले वर्तुल हे इष्ट वर्तुल आहे. अन्य सूत्रांप्रमाणे येथेहि ही पद्धति कशी शोधली ह्याबद्दल काहीच मार्गदर्शन नाही, तरीहि आपण त्याचा तर्काने शोध लावू शकतो. मूळ चौरसाची बाजू २ प्रमाणक मानल्यास अर्धा कर्ण अम= वर्गमूळ २ हे उघड आहे. म हा मध्य मानून अ, ब, क आणि ड बिंदूमधून जाणारे अम ह्या त्रिज्येचे वर्तुल चौरसाहून मोठे असेल. म हा मध्य मानून आणि मप त्रिज्या मानून काढलेल्या वर्तुलाच्या अब, बक, कड आणि डअ ह्या स्पर्शरेषा असतील आणि ते वर्तुल चौरसाहून छोटे असेल. म्ह्णजेच इष्ट वर्तुलाची त्रिज्या मप आणि अम = इम ह्यांच्या मधोमध कोठेतरी पडेल. असे दिसते की शुल्बकारांनी पइ ह्या खंडाचे वेगवेगळ्या भाजकांनी भाग पाडून सर्वात चांगला अंदाज भाजक = ३ ह्यामुळे मिळतो असे मानलेले दिसते. त्यांच्या कार्यापुरता त्यांना तो पुरेसा सूक्ष्म वाटला असला पाहिजे. आपल्याला आज माहीत असलेले ’वर्तुलाचे क्षेत्र / त्रिज्या वर्ग = π’ हे समीकरण वापरून वर दाखविलेल्या मार्गाने ’π’ चे मूल्य ३.०८८०८ इतके निघते. ते वस्तुत: ३.१४१५९ च्या जवळपास आहे. एक्सेलमध्ये ’फइ’साठी वेगवेगळे भाजक वापरून हेच गणित सोडविण्याचा प्रयत्न करून पाहता येतो. जर २०० भाग केले तर सर्वात चांगले उत्तर ६१व्या आणि ६२व्या भागांच्या मध्ये पडते. ६१ भाग घेतले तर वर्तुलाचे क्षेत्र इष्ट क्षेत्राच्या (= ४) तुलनेने −०.०१४५१ ने लहान पडते आणि ६२ भाग घेतले तर ते ०.०००१६२ ने मोठे पडते. १०० भाग केले तर इष्ट उत्तर ३०वा भाग आणि ३१वा भाग ह्यांमध्ये पडते. ५० भाग केले तर १५व्या आणि १६व्या भागामध्ये पडते. ३० भाग केले तर उत्तर ९व्या आणि १०व्या भागाच्या मध्ये पडते म्हणून ’पइ’ चे ३ भाग पाडून त्याचा तिसरा भाग त्रिज्येकडे जोडावा असे शुल्बकारांनी ठरविलेले दिसते. वर्तुलाचा चौरस. मण्डलं चतुरस्रं चिकीर्षन्विष्कम्भमष्टौ भागान्कृत्वा भागमेकोनत्रिंशधा विभज्याष्टाविंशतिभागानुद्धरेत्। भागस्य च षष्ठमष्टमभागोनम्। बौधायन २.१० सरळ अर्थ - वर्तुलाचा चौरस करू इच्छिणार्‍याने व्यासाचे आठ भाग करून (सात ठेवावेत). उरलेल्या एकाचे २९ भाग करून त्यांपैकी अठ्ठावीस काढून टाकावेत आणि एकोणतिसाव्याचे सहा भाग करून त्यातील एकाला, त्याचा आठवा भाग वगळून, काढून टाकावे. (हे चौरसाच्या बाजूचे मान होय.) टिप्पणी - वरील वर्णनानुसार वर्तुलाचा व्यास ’अ’ एकक इतका मानला तर चौरसाची बाजू = अ[१ − १/८ + १/(८×२९) − १/(८×२९×६) + १/(८×२९×६×८)] इतकी येते. हे सूत्र म्हणजे ह्यापूर्वीच्या सूत्राचा व्यत्यासच आहे. सोप्या समजुतीसाठी वरील आकृतीतील चौरस हा इष्ट चौरस होण्यासाठी मप ही लांबी १२ अंगुलि = ४०८ यव असे मानावे. १ अंगुलि = ३४ यवाचे दाणे हे कोष्टक भाग २ मध्ये दिले आहे. असे मानल्यास मइ = ५७७ यव, पइ = १६९ यव आणि पफ = ५६ १/३ यव असे दिसते. म्हणून मफ = ४६४ १/३ यव. ह्याचा अर्थ असा की ज्या चौरसाची अर्धी बाजू ४०८ यव इतकी आहे, त्या चौरसाच्या बरोबरीचे क्षेत्रफल असणार्‍या वर्तुलाची त्रिज्या ४६४ १/३ यव इतकी असते किंवा, उलटीकडून पाहिल्यास, ज्या वर्तुलाची त्रिज्या ४६४ १/३ यव इतकी असते त्या वर्तुलाला समक्षेत्र असलेल्या चौरसाच्या अर्ध्या बाजूचे मान ४०८ यव इतके असते. आता प्रश्न उरला तो म्हणजे ४६४ १/३ यव इतक्या लांबीचे तुकडे पाडत आणि ते मूळ लांबीमधून कमी करत वा वाढवत ४०८ यव ह्या मानापर्यंत कसे पोहोचायचे. त्यासाठी प्रथम दोन्ही मानांची तिप्पट करावी, जेणेकरून त्यातील गैरसोयीचा अपूर्णांक निघून जाईल. आता आपणास १३९३ पासून १२२४ पर्यंत पोहोचायचे आहे. १३९३ × १/८ = १७४ १/८ आणि १३९३ × ७/८ = १२१८ ७/८, तसेच १२२४ – १२१८ ७/८ = ५ १/८ . आता १७४ १/८ मधील १/८ कडे दुर्लक्ष करावे. १७४ ÷ २९ = ६ = ५+१. म्हणजेच १२७४ = १३९३[१ − १/८ + १/(८×२९) − १/(८×२९×६) + १/(८×२९×६×८)]. हे समीकरण वर्तुलाची त्रिज्या आणि चौरसाची अर्धी बाजू ह्यांच्यामधील आहे. दोन्हीची दुप्पट केली म्हणजे दिसते की वर्तुलाचा व्यास आणि चौरसाची बाजू ह्यांच्यामध्ये हेच समीकरण आहे.

Saturday, December 7, 2013

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

३२) फोरास रोड (आर एस निमकर मार्ग) - हे नाव कोठल्याहि साहेबाचे नसून मुंबई बेटे पोर्तुगीज अमलाखाली असण्याच्या दिवसांत ह्या शब्दाचा उगम आहे.  तेव्हा ही बेटे वसईकर पोर्तुगीज अमलाचा भाग होती. बेटावरील जमीन ज्या धारकांकडे होती त्यांचे जमिनीवरचे हक्क कशा प्रकारचे होते ह्या विषयाशी ह्या नावाचा संदर्भ आहे आणि त्याचे दोन परस्परविरोधी अर्थ लागू शकतात असे दिसते.  अशा जमिनीस पोर्तुगीज शासक ’फोरा’ जमीन असे म्हणत असत.  हा पोर्तुगीज ’फोरा’ शब्द कसा निर्माण झाला ह्याविषयी दा कुन्हा ह्यांनी विस्तृत वर्णन केले आहे परंतु त्यांच्या पुस्तकाचे जालावरील उपलब्ध पान संपूर्णपणे अवाचनीय आहे. मायकेल वेस्ट्रॉप ह्या न्यायाधीशांच्या निर्णयात ह्याच शब्दाचा वेगळा अर्थ लावला आहे.  त्या सर्व वादात
अधिक न शिरता असे म्हणता येईल की १८४० नंतर वाढत्या मुंबईत किल्ल्याच्या उत्तरेस सार्वजनिक सोयी - रस्ते, नाले इ. - निर्माण करण्यासाठी सरकारला ह्या जमिनीचा काही भाग हवा होता आणि तो सरकारने कसा घ्यावा ह्याविषयी सरकार आणि जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई पेस्तनजी अशा जमीनधारकांमध्ये विवाद होता.

किल्ल्याच्या उत्तरेकडील सर्वच जमीन ’फोरा जमीन’ ह्या वर्णनाखाली येते आणि त्या भागात जाणार्‍या रस्त्यांना ’फोरास रस्ते’ असे सार्वत्रिक नाव होते.  कालक्रमाने हे रस्ते जेव्हा पक्के बांधून वापरात आले तेव्हा त्यांना स्वत:ची अलगअलग नावे मिळाली आणि केवळ एकाच रस्त्याचे म्हणून हे नाव शिल्लक उरले. बेलासिस रोड (जहांगिर बोमन बेहराम मार्ग) आणि ग्रॅंट रोड ह्यांना जोडणार्‍या रस्त्यालाच काय ते हे नाव उरले आहे.  १९०९ सालच्या इंपीरिअल गॅझेटमधील नकाशात ह्याचा उल्लेख ’कामाठीपुरा रोड’ असा केला आहे. त्या नकाशाचाहि तुकडा खाली जोडला आहे.


३३) फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) - फ्लोरा फाउंटन हे मूळचे फ्रियर फाउंटन आणि सर बार्टल फ्रियर ह्यांच्या नावे ते विक्टोरिया गार्डनमध्ये उभे राहायचे होते.  अग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी नावाची संस्था ह्या प्रस्तावामागे होती पण तिच्याजवळचे पैसे संपल्यामुळे त्यावेळचे क्रॉफर्ड ह्यांनी पुढाकार घेऊन त्याला सध्याच्या जागी आणले.  कर्सेटजी फर्दूनजी ह्यांची मोठी देणगीहि ह्या कामी लागली.  मूळच्या चर्चगेटच्या जागीच ते आता उभे आहे.  फाउंटनवरील फ्लोरा देवतेवरून हे नाव पडले आहे.  खालील चार स्त्रिया हिंदुस्तानात उत्पन्न होणार्‍या चार शेतमालांची प्रतीके असून डॉल्फिन्स, सिंह अशा प्राण्याच्या शिल्पांनी त्याला शोभा आणली आहे.  त्याची सध्याची दोन चित्रे आणि १८७१ मध्ये ’सायंटिफिक अमेरिकन’ नियतकालिकाच्या अंकात दिसणारे एक चित्र पुढे दाखवीत आहे. (श्रेय )




३४) जेकब सर्कल - सातरस्ता (गाडगेमहाराज चौक) -  मे.ज. सर जॉर्ज जेकब (१८०५-६१) ह्यांचे नाव मुंबई प्रांतात प्रामुख्याने सावंतवाडी, कोल्हापूर आणि काठेवाड संस्थानांमध्ये मुंबईकरांचे प्रतिनिधि म्हणून माहीत आहे.  कोल्हापुरात १८५७ च्या काळात संस्थान शांत ठेवण्याच्या कार्यात त्यांनी विशेष कर्तबगारी दर्शविली.  त्यांचे नाव मुंबईतील ह्या प्रमुख चौकास देण्यात आले होते.  चौकात सात मोठे रस्ते एकत्र मिळत असल्याने स्थानिक रहिवासी चौकास सातरस्ता ह्या प्रसिद्ध नावानेहि ओळखतात.  चौकातील कारंजे जेकब ह्यांच्या मानलेल्या मुलीने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे.  जेकब हे मराठी आणि संस्कृत भाषांचे अभ्यासकहि होते.  गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचे त्यांनी वाचन केले होते.

सर जॉर्ज जेकब (श्रेय) 



३५) कामाठीपुरा - बेलासिस रोड (जहांगीर बोमन बेहराम मार्ग), सुखलाजी स्ट्रीट, ग्रॅंट रोड (मौलाना शौकत अली मार्ग) आणि डंकन रोड (मौलाना आझाद मार्ग) ह्या मर्यादा असलेल्या भागास कामाठीपुरा असे नाव तेथे वसतीला आलेल्या कामाठी-कोमटी लोकांवरून पडले आहे.  निजामाच्या प्रदेशातील हे मूळचे लोक १८व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसात कामधंद्यासाठी मुंबईत आले आणि ह्या भागात स्थायिक झाले. प्रथमपासून हा भाग निम्नस्तरातील जनतेच्या वस्तीचा आणि तेथे चालणारा वेश्याव्यवसायहि असाच त्या दिवसांपासूनचा आहे.  (१८व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये मुंबईत रामा कोमटी नावाचा सधन हिंदु राहात असे.  कान्होजी आंग्रे ह्यांच्याशी गुप्त संधान बांधल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी १७२०मध्ये त्याच्यावर खोटा ’कांगारू’ खटला चालवून त्याला आयुष्यातून उठविले.  त्याच्याशी कामाठीपुर्‍याचा संबंध लावल्याचे मी वाचले आहे पण त्यात मलातरी काही अर्थ दिसत नाही.  ह्या खटल्याचा वृत्तान्त मुंबई उच्च न्यायालयाच्या  ह्या संस्थळावर  वाचायला मिळतो.  ह्या अनुसार हा खटला १७२० साली झाला आणि रामा कोमटी हा कोमटी नसून राम कामत नावाचा शेणवी जातीचा गृहस्थ होता.  तसेच १७८४ मध्ये महालक्ष्मीजवळ समुद्राला हॉर्नबी वेलार्ड हा बांध घालण्यापूर्वी सध्याचा कामाठीफुरा हा पाण्याखालीच होता.  ह्या दोन कारणांसाठी रामा कोमटीचे नाव कामाठीपुर्‍याशी जोडता येत नाही.)

३६-३९) केनेडी ब्रिज, मॅथ्यू रोड, फ्रेंच ब्रिज आणि गवालिया टॅंक - ही चारहि स्थाने खाली जोडलेल्या इंपीरिअल गॅझेट १९०९ मधील नकाशाच्या तुकडयात दिसत आहेत.  तसेच केनेडी, मॅथ्यू, फ्रेंच ह्या तिघांचे पुतळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात एकत्र ठेवलेले आहेत त्याचे चित्रहि दिसत आहे.



कर्नल जे.पी.केनेडी कन्सल्टिंग एंजिनीअर म्हणून, कर्नल पी.टी.फ्रेंच हे रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून आणि फ्रान्सिस मॅथ्यू हे चीफ एंजिनीअर आणि नंतर एजंट (मुख्य अधिकारी) म्हणून असे तिघेहि १८६० ते १८८० च्या दशकांमध्ये BB&CI रेल्वेच्या कामाशी संबंधित असे उच्च अधिकारी होते.  फ्रेंच ह्यांच्याविषयी आणखी मनोरंजक माहिती म्हणजे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची समज आणि गोडी असावी असे जालावरील उल्लेखांवरून वाटते.  बहुतेक इंग्रजांना पाश्चात्य संगीताची सवय असल्याने हिंदुस्तानी संगीत समजत नसे आणि कंटाळवाणे वाटे.  त्याचे कारण म्हणजे बहुतेकांची ह्या संगीताशी ओळख संस्थानिकांच्या दरबारात होणार्‍या नाचगाण्यांमधून होते आणि खर्‍या गवयांचे गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असेहि एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे.  पी.टी.फ्रेंच हे ह्या बाबतीत थोडे निराळे असावेत कारण त्यांनी मेहनतीने गोळा केलेल्या भारतीय वाद्यांच्या संग्रहाचे - जो संग्रह त्यांनी नंतर रॉयल आयरिश ऍकॅडेमीकडे सुपूर्द केला - कर्नल मेडोज टेलर  ह्यांनी केलेले परीक्षण जालावर येथे  पाहता येते.

१८५०-६० पर्यंत गवालिया टॅंक हा भाग जवळजवळ मोकळाच आणि ग्रामीण भागासारखा होता.  गवळी आणि गुराखी आपली गुरे चरण्यासाठी आणि धुण्यासाठी येथे आणत असत. हे गायीम्हशी धुण्याचे काम ज्या तलावावर चालत असे गवळी तलाव असे नाव पडले.  चालू ’गवालिया’ हे नाव मूळ नावाचे बदललेले रूप दिसते कारण १९०९ च्या नकाशात त्याचे नाव Gowli Tank गवळी तलाव असेच दर्शविले आहे.  १९०९ नंतर लवकरच हा तलाव बुजविण्यात आला कारण शेपर्ड ह्यांनी तसा उल्लेख केला आहे.  सध्याच्या नाना चौकातून केम्प्स कॉर्नरमार्गे भुलाभाई देसाई मार्ग (Warden Road) आणि एल. जगमोहनदास मार्ग (Nepean Sea Road) ह्यांच्याकडे जाणार्‍या रस्त्याला प्रथम गवालिया टॅंक रोड असे नाव होते आणि ते तसेच चालू राहिले. बुजवलेल्या तलावाच्या जागी मोकळे मैदान निर्माण झाले.  ऑगस्ट ८, १९४२ ह्या दिवशी महात्मा गांधींनी ह्या मैदानामध्ये छोडो भारत - Quit India - ही घोषणा करून स्वातन्त्र्यलढयाचे शेवटचे पान उलटले.  त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलीकडच्या काळात रस्त्याचे नाव ऑगस्ट क्रान्ति मार्ग आणि मैदानाचे नाव ऑगस्ट क्रान्ति मैदान असे बदलण्यात आले.  गूगल मॅप्समधील मैदानाचे चालू चित्र आणि त्यामध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे चित्र खाली दर्शवीत आहे.  (श्रेय.)





४०-४३) ग्रीन स्ट्रीट, एल्फिन्स्टन सर्कल (हॉर्निमन सर्कल), हमाम स्ट्रीट (अंबालाल दोशी मार्ग). -  मुंबईतील प्रसिद्ध टाउन हॉलसमोरील जागेस ब्रिटिश दिवसांमध्ये एल्फिन्स्टन सर्कल असे नाव होते.  त्या मोकळ्या जागेचा उपयोग निर्यातीसाठी मुंबईत आणलेल्या कापसाच्या साठवणीसाठीहि केला जात असे आणि त्या कारणाने त्या मोकळ्या जागेस कॉटन ग्रीन असे म्हणत असत.  ही साठवणीची जागा कुलाब्यात नेईपर्यंत ’कॉटन ग्रीन’ एल्फिन्स्टन सर्कल मध्येच होते.  कॉटन ग्रीन तेथून हलले तरी त्याची आठवण अद्यापि  ’ग्रीन स्ट्रीट’ ह्या रस्त्याच्या नावात टिकून आहे.  स्वातन्त्र्यानंतर एल्फिन्स्टन सर्कलचे नाव बदलून ’हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले आहे.  खालील चित्रामध्ये हमाम स्ट्रीट आणि एल्फिन्स्टन सर्कल दिसत आहे.  ग्रीन स्ट्रीट ह्या नकाशाच्या तुकडयात दिसत नाही पण हमाम स्ट्रीटपासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता म्हणजे ग्रीन स्ट्रीट.  गूगल मॅप्समध्ये हा नावासकट दिसतो.


बी.जी.हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश वृत्तपत्रकार पत्रकारितेच्या व्यवसायासाठी हिंदुस्तानात आले आणि ब्रिटिश राजवटीचे विरोधक आणि स्वातन्त्र्य चळवळीचे पाठिराखे बनले.  मुंबईतील बॉंबे क्रॉनिकलचे संपादक असतांना जालियनवाला बागेसंबंधीच्या त्यांच्या लिखाणामुळे त्यांना हिंदुस्तान सोडावा लागला पण परत येऊन त्यांनी पुन: ते पत्र हाती घेतले.  १९२९ नंतर त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले.

खाली ’बॉंबे क्रॉनिकल’चा मार्च १,१९१९ चा अंक दाखवीत आहे. (श्रेय.) अंकामध्ये मध्यभागी 'The Satyagraha Vow' अशा शीर्षकाखाली रौलट बिलाविरुद्ध महात्मा गांधींची सत्याग्रहाची घोषणा दाखविली आहे.  त्याखाली 'Mr. Gandhi's Manifesto' दिसतो.  त्याच्या शेजारी दोन कॉलम्समध्ये 'Signatories to the Pledge' अशी नावे आहेत.  डाव्या बाजूचे पहिले नाव 'Mohanadas Karamchand Gandhi, Satyagraha Ashram, SabaramatI'  आणि त्याखालचे नाव ’Vallabhbhai J. Patel, Bar-at-Law, Ahmedabad'  अशी आहेत.  उजव्या बाजूचे पहिले नाव B.G.Horniman, Editor, "The Bombay Chronicle," Bombay असे आहे.  पुढे डी.डी.साठे (गिरगावातील डी.डी.साठे मार्ग), अवंतिकाबाई गोखले (अवंतिकाबाई गोखले मार्ग), सरोजिनी नायडू अशीहि नावे दिसतात.


ग्रीन स्ट्रीटजवळच ’हमाम स्ट्रीट’ आहे.  येथे कधीकाळी असलेल्या सार्वजनिक स्नानगृहावरून ते नाव पडले.

४४) किंग्ज सर्कल स्टेशन - २०व्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबईच्या वाढत्या वस्तीला राहण्यासाठी जागा आणि पाणीपुरवठा-मलनि:सारणासारख्या बाबी पुरविण्यासाठी विचार करावयास हवा अशी जाणीव मुंबई सरकार आणि महानगरपालिकेस होऊ लागली होती आणि त्यातूनच १९०९च्या सुमारास Bombay Development Committee, Bombay Improvement Trust अशांची निर्मिती झाली होती.  त्यांच्या शिफारशीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दादर-माटुंगा ह्यांच्या पूर्वेकडील भाग वस्तीयोग्य करणे असा होता आणि त्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटपासून शीवपर्यंत १५० फूट रुंदीचा रस्ता बांधणे हा विचार समाविष्ट होता.  प्रत्यक्षात इतका मोठा रस्ता झाला नाही पण नायगाव-दादर-माटुंगा भागात विन्सेंट रोड (सध्याचा बाबासाहेब आंबेडकर मार्ग) नावाचा रुंद रस्ता बांधला गेला. विन्सेंट हे मुंबईचे पोलिस कमिशनर होते.  ह्या रस्त्याच्या शीवकडील बाजूचा शेवट एका वर्तुळाकृति बागेमध्ये झाला आणि त्या बागेस ’किंग्ज सर्कल’ असे नाव दिले गेले.  हल्ली ह्याच बागेस माहेश्वरी उद्यान असे नाव आहे पण जुने किंग्ज सर्कल एका उपनगरी स्थानकाच्या रूपाने अजून जिवंत आहे.  अंधेरी ह्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकाकडे जाणार्‍या मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडया हार्बर लाईनने येऊन शीव आणि माटुंगा ह्या मध्य रेल्वेच्या स्टेशनांदरम्यान पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे येऊन अंधेरीकडे जातात.  येथे असलेल्या स्टेशनास किंग्ज सर्कल असे नाव आहे.  (किंग्ज सर्कलसंबंधित पुढील चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.)



४५-५०) खोताची वाडी, कांदेवाडी, करेलवाडी, गायवाडी, मुगभाट, झावबाची वाडी अशा गिरगावातील छोटया गल्ल्या.  - खोती हे वतन कोकण प्रान्तातील पारंपारिक वतन आहे.  गावातील सरकारी उत्पन्न सरकारकडे भरण्याचा पत्कर खोत घेतो आणि त्या बदल्यात जमीन कुळाकडे कमीअधिक काळासाठी कसायला देऊन त्यांच्याकडून उत्पन्न गोळा करतो.  दादोबा वामन खोत ह्या पाठारे प्रभु व्यक्तीने ह्या भागातील खोती इनाम सरकारातून मिळविले.  त्याच्यावरून ह्या भागास खोताची वाडी हे नाव मिळाले.

कांदेवाडीमध्ये कांदे साठवण्याची वखार - godown - होती आणि शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत ती तेथे असावी असे दिसते.

करेलवाडी - हे नाव मूळचे करळवाडी असे असावे कारण तेथे मिळणार्‍या ’Karel’ जातीच्या दगडावरून हे नाव पडले आहे असे शेपर्ड लिहितात.  मोल्सवर्थच्या १८३१ च्या कोशात ’करळ’ असा शब्द असून त्याचा अर्थ ’a soft sandy stone’ असा दिला आहे.

गायवाडी - गायी ठेवण्याची जागा असा ह्याचा स्पष्ट अर्थ शेपर्ड देतात.  मुंबईत अजूनहि दोनतीन गायवाडया आहेत असे ते नोंदवतात. उदा. लेडी जमशेटजी रोडपासून माहीम बझारकडे जाणारा रस्ता.  आज हा रस्ता कोणता असावा असा तर्कच करावा लागेल.

मुगभाट - दा कुन्हा ह्यांच्या मताने ’मुंगा’ नावाचा कोळी जमातीमधील कोणी एक पुढारी व्यक्ति होऊन गेला. त्याचे ’भाट’ (शेत) ते मुगभाट.  रा.ब.जोशींच्या मते ’मुगाचे शेत’ अशा अर्थाने हे नाव पडले आहे. (मुंबादेवीच्या नावाशीहि मुंगा कोळ्याचा संबंध कोठेकोठे लावला आहे.  ’मुंगादेवी’चे ’मुंबादेवी’ असे रूपान्तर झाले असे म्हणतात.)

झावबाची वाडी हे नाव विश्वनाथ विठोजी झावबा ह्यांच्या नावावरून पडले आहे कारण १८व्या शतकात त्यांनी ही वाडी - जिचे तत्पूर्वीचे नाव रणबिल वाडी असे शेपर्ड नोंदवतात - विकत घेतली आणि ती त्यांच्या वंशजांकडे वारसाहक्काने जात राहिली.  विश्वनाथ ह्यांचे नातू विठोबा झावबा ह्यांनी तेथील ’झावबा राम मंदिर’ ह्या नावाने ओळखले जाणारे देऊळ १८८२ मध्ये बांधले.  विश्वनाथ ह्यांचे एक पणतू नारायण मोरोजी हे तेथे शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत राहात होते.

५१) लालबाग - जहाजबांधणी व्यवसायातील प्रख्यात वाडिया कुटुंबातील लवजी वाडिया ह्या मूळ व्यक्तीचे पणतू दादाभाई पेस्तनजी हे सध्याच्या लालबाग-परळ भागातील जमिनीचे मालक होते आणि तेथील त्यांच्या बंगल्याला ’लालबाग’ असे नाव होते. ओरिएंटल बॅंक १८७५ मध्ये बुडाली त्यात पेस्तनजींची बहुतेक मालमत्ता नष्ट झाली.  ही माहिती जेम्स डग्लस ह्यांच्या 'Glimpses of Old Bombay' ह्या १८७५ मध्ये छापलेल्या पुस्तकात मिळते (पान १११).  ह्यावरून मी असा तर्क करतो की त्या भागात नंतर निर्माण झालेल्या वस्तीला लालबाग बंगल्यावरून ’लालबाग’ हे नाव मिळाले असावे.

५२) लेडी जमशेटजी रोड - दादर-माहीम भागातील ह्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधणीची कथा आर.पी.करकारिया ह्यांनी २२ सप्टेंबर १९१०च्या 'The Advocate of India' मध्ये सांगितली आणि ती शेपर्ड ह्यांनी नोंदवली आहे.  वान्द्रे आणि त्यापलीकडील भाग हा मुंबईपासून माहीम खाडीने अलग ठेवलेला होता आणि इकडून तिकडे येण्याजाण्यासाठी नावांचा वापर केला जात असे.  १८२०-३० पासून हे दोन भाग जोडून सलग करण्याचे प्रयत्न मुंबईतील सधन व्यापार्‍यांकडून चालू होते पण त्यासाठी पुरेसे पैसे उभे करता आलेले नव्हते.  खाडीमध्ये नंतर एकदा वीस नावा बुडून सर्व प्रवासी मृत्यु पावले तेव्हा सर जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी सर्व खर्च स्वत: करून हे काम अंगावर घेण्याचे ठरविले.  एकूण २ लाखाहून अधिक खर्च करून हा भराव आणि रस्ता १८५४ च्या सुमारास बांधला गेला आणि जमशेटजींची पत्नी लेडी जमशेटजी ह्यांचे नाव त्या रस्त्याला देण्यात आले.

Tuesday, November 26, 2013

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग २.

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग २.

’२’ ह्या संख्येचे वर्गमूळ.

प्रमाणं तृतीयेन वर्धयेत्तच्च चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन। सविशेष:।
बौधायन २.१२. इतर शुल्बकारांनीहि जवळजवळ ह्याच शब्दांमध्ये हे मूल्य दाखविले आहे.

सरळ अर्थ - प्रमाण बाजूमध्ये तिचा तिसरा भाग, त्याचा चौथा भाग वाढवावा. त्याचा चौतिसावा भाग कमी करावा.  त्यात अजून काही थोडे मिळविले (की इष्ट उत्तर मिळते.)

टिप्पणी - दिलेल्या चौरसाच्या दुप्पट आकाराचा चौरस निर्माण करण्याची पद्धति येथे संक्षिप्तपणाने दर्शविली आहे.  अशा दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू = मूळच्या चौरसाचा कर्ण हे उघड आहे. मूळ चौरसाच्या बाजूचे प्रमाण = १ असे मानल्यास त्या चौरसाचा कर्ण = वर्गमूळ २.   ’२’ चे वर्गमूळ म्हणजे किती हे येथे दर्शविले आहे.  ’१ + १/३ + १/३*४ - १/३*४*३४ + थोडेसे वर (सविशेष)’ असे हे ’२’ चे वर्गमूळ दाखविले आहे.  आकडेमोड केल्यास १+१/३+१/३*४-१/३*४*३४ = १.४१४२१५६... आणि वर्गमूळ २ = १.४१४२१३... हे पाहिल्यावर असे जाणवते की शुल्बकारांना माहीत असलेले उत्तर खर्‍या उत्तराच्या खूपच जवळचे आहे.  हे उत्तर त्यांनी कसे शोधून काढले असावे?

हा विचार करण्यासाठी शुल्बकारांना उपलब्ध असलेले संख्याज्ञान कशा प्रकारचे होते आणि त्यांचे अंकगणितातील क्रियांचे ज्ञान कशा प्रकारचे होते हे पाहायला लागेल.  १, २, ३ अशा नैसर्गिक पूर्ण संख्या, हातापायाच्या १० बोटांवरून १०, १००, १००० अशा संख्या आणि ह्यांच्या संकलनाने (बेरीज) आणि व्यवकलनाने (वजाबाकी) निर्माण होऊ शकणार्‍या उर्वरित नैसर्गिक पूर्ण संख्या मनुष्यजातीने सहज निरीक्षणामधून निर्माण करून त्या भिन्नभिन्न दर्शविण्यासाठी आवश्यक ती चिह्नेहि निर्माण केली असणे स्वाभाविकच मानता येईल.  रोमन संस्कृतीने निर्माण केलेली अशी चिह्ने अजूनहि मर्यादित वापरात आहेत. शुल्बकालीन भारतीयांची अशी चिह्ने काय होती ह्याचा काहीच पुरावा उरलेला नाही, यद्यपि अशी चिह्ने असणार हे निश्चित.  तशाच नैसर्गिक विचाराने मोठया समुच्चयाचे एकाच आकाराच्या लहान समुच्चयांमध्ये विभाजन करणे - जसे की १० चे ५ आणि ५ असे दोन बिभाग, १८ चे ६,६,६ असे तीन विभाग - हेहि माहीत असणार. (परंतु १० चे ३ भाग कसे होऊ शकतील हा विचार त्यांच्या झेपेपलीकडील होता.)  दोन संख्यांचे संकलन (बेरीज) अथवा त्यांपैकी एकातून दुसरी घालविणे असे व्यवकलन (वजाबाकी) ह्या कृतीहि नैसर्गिकत: सुचणार्‍या आहेत.  मात्र ’शून्य’ ह्या संकल्पनेची निर्मिति आणि तिचा वापर करून संख्येच्या स्थानावरून तिचे मूल्य १० च्या पटीत बदलणे हे ज्ञान अजून काही शतके दूरच होते आणि त्याशिवाय गुणाकार आणि भागाकार हेहि शक्य नव्हते.  (रोमन आकडे वापरून गुणाकार करता येत नाही ह्यावरून हे स्पष्ट होईल.)  शेती आणि पशुपालन हे मुख्य व्यवसाय असलेल्या आणि संपूर्णत: यन्त्रविरहित असलेल्या समाजाला आपले दैनंदिन जीवन चालविण्यासाठी ह्याहून अधिक गणितज्ञानाची आवश्यकताहि नव्हती.

अशा स्थितीत एका संख्येपासून ज्याला आपण ’वर्ग’ म्हणतो अशी दुसरी संख्या कशी काढायची?  उत्तर सरळ आहे.  ५ चा वर्ग काढायचा म्हणजे धान्याचे दाणे ५ च्या ओळींमध्ये एकाखाली एक अशा ५ वेळा ठेवायचे आणि एकूण दाणे मोजायचे.

दिलेल्या चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळाचा वर्ग कसा काढायचा?  दिलेला चौरस शेजारीशेजारी दोन वेळा मांडायचा आणि त्यातील दाणे खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे मांडून नवा चौरस मिळतो का हे पाहायचे.  आकृतीत ५ इतकी बाजू असलेले दोन चौरस शेजारीशेजारी काढून तेच धान्याचे दाणे वेगळ्या मार्गाने  मांडून नवा चौरस मिळतो काय हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.  असे दिसते की ७ बाजू असलेला नवा चौरस ह्यातून निघतो पण १ दाणा शिल्लक राहतो.  हा प्रयोग कोठल्याहि संख्येवर केला तरी सगळे दाणे वापरून नवा चौरस निर्माण करता येत नाही हे लवकरच ध्यानात येते.  प्रत्येक वेळी काही दाणे उरतात तरी किंवा कमी पडतात.  म्हणजेच केवळ पूर्णांक आणि पूर्ण विभाजन देणारे भागच केवळ वापरून दुप्पट आकाराचा चौरस निर्माण करता येत नाही हे लक्षात येते.


हे नाही तर नाही पण ’सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:’ असा विचार करून सर्वसाधारणत: अदमासाने दुप्पट म्हणता येईल असा चौरस तरी सापडेल काय असा विचार सुरू होतो.  त्यासाठी प्रथम एक संख्या घ्यायची, तिच्या चौरसाचे मान काढायचे, त्याची दुप्पट करायची आणि त्या दुपटीच्या जवळ येईल अशी वर्गसंख्या कोठल्या संख्येची आहे असा शोध घ्यायचा.  (हे सर्व कार्य वर दिलेल्या अंकगणिताच्या मर्यादेत राहून करणे शक्य आहे.)  असे केले म्हणजे (५,७), (१७.२४), (२९,४१), (३४.४८) अशा अनेक जोडया नजरेस येतात पण त्या सर्वांमध्ये एक दोष आहे आणि तो असा की पहिल्या संख्येच्या वर्गाची दुप्पट आणि दुसया संख्येचा वर्ग ह्यांमध्ये बर्‍यापैकी अंतर आहे आणि ही ढोबळ चूक जितकी पट करू तितक्या प्रमाणात वाढत जाईल.  समाधानकारकरीत्या लहान अशी चूक मिळण्यासाठी बरेच पुढे जावे लागेल पण तसे केले की (४०८,५७७) ही जोडी मिळेल जेथे ह्या संख्यांच्या आकारच्या मानाने चूक अगदीच क्षुल्लक आहे.  ४०८ चा वर्ग = १,६६,४६४, त्याची दुप्पट ३,३२,९२८ आणि ५७७ चा वर्ग = ३,३२,९२९.  म्हणजेच ४०८ प्रमाणक इतकी बाजू असलेला चौरस घेतला तर त्याच्या दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू ५७७ पेक्षा अगदी क्षुल्लक फरकाने लहान आहे. हाच ’सविशेष’.

आता प्रश्न येतो की ४०८ प्रमाणक लांबीने प्रारंभ करून आणि वर उल्लेखिलेल्या अंकगणिती मर्यादेत राहून ५७७ प्रमाणक इतकी लांबी कशी मिळवायची.  ४०८ चा अर्धा भाग त्याच्या पुढे ठेवला तर आपण ६१२ ला पोहोचतो, जी संख्या ५७७ च्या बरीच पुढे आहे.  ४०८ चा तिसरा भाग १३६ त्यापुढे मांडला तर आपण ५४४ ला पोहोचतो.  त्या तिसर्‍या भागाचा चौथा भाग त्यापुढे ठेवला तर आपण ४०८+१३६+३४ = ५७८ ला पोहोचतो.  आता आपली उडी ५७७ च्या पुढे १ प्रमाणक इतकी पडली आहे.  तो १ (= ४०८ च्या तिसर्‍या भागाच्या चौथ्या भागाचा चौतिसावा भाग) कमी केला म्हणजे आपण ५७७ ला पोहोचतो.  ह्यात ’सविशेष’ मिळवला म्हणजे इष्ट त्या दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू मिळेल.  वेगळ्या शब्दात लिहायचे तर मूळ चौरसाची बाजू १ प्रमाणक मानली तर इष्ट चौरसाची बाजू =
१+१/३+१/३*४-१/३*४*३४+सविशेष
किंवा चालू भाषेत
१.४१४२१५६... 

शुल्बसूत्रांमध्ये वापरलेले लांबीचे कोष्टक ३४ यवाचे दाणे = १ अंगुलि, १२ अंगुलि = १ प्रदेश असे असते. कोष्टकांसाठी साधारणत: निवडले जाणारे २,४,८.१६ असे सोपे आकडे सोडून शुल्बकारांची नजर ३४ वर का पडली असावी ह्याचाहि उलगडा येथे होतो.  दिलेल्या चौरसाची बाजू = १ प्रदेश असे मानल्यास इष्ट चौरसाची बाजू आता १ प्रदेश + ५ अंगुलि + १ यव असे मांडता येते.  तसे मांडता यावे म्हणून ३२ वा ३६ हे ’सोयीस्कर’ आकडे वगळून तेथे शुल्बकारांनी ३४ यव = १ अंगुलि असे ठरविले असले पाहिजे.

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग १.



शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग १.

प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्यांचे यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत.  ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे.  कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.  पहिला गृह्यसूत्रे, ज्यांमध्ये व्यक्तींच्या घरांमध्ये होणारे बिवाह, जन्म, मृत्यु अशा प्रकारचे कौटुंबिक विधि कसे केले जावेत हे सांगितले आहे.  दुसरा श्रौतसूत्रे, ज्यांमध्ये अधिक मोठे. सार्वजनिक स्वरूपाचे असे विधि (अनेक मन्त्रपाठक आणि अनेक प्रकारचे अग्नि ह्यांच्यासह केले जाणारे) वर्णिले आहेत.  ह्यांपैकी यज्ञामधील एक वा अनेक वेदि अथवा चिति कोणत्या आकारांच्या आणि लांबीरुंदीच्या असाव्यात, त्यांचे एकमेकांशी प्रमाण काय असावे असावी हे सांगणे हे शुल्बसूत्रांचे एक प्रमुख कार्य आहे आणि ह्यातूनच आपल्याला वेदकालीन भारतात भूमितिज्ञान किती आणि कशा प्रकारचे होते ह्याची कल्पना येते.

वेदांच्या निरनिराळ्या शाखांशी संलग्न अशी नऊ शुल्बसूत्रे माहीत आहेत.  त्यांमध्ये बौधायन, आपस्तम्ब, कात्यायन आणि मानव अशी चार प्रमुख शुल्बसूत्रे आहेत.  ’शुल्ब’ अथवा ’शुल्व’ म्हणजे दोरी अथवा रज्जु.  यज्ञवेदि बांधण्यासाठी अंतराअंतरावर गाठी बांधलेल्या रज्जूच्या वापराने लांबी मोजणे, वर्तुळ काढणे अशा गोष्टी केल्या जातात.  सर्व शुल्बसूत्रांमध्ये प्रारंभी अनेक भौमितिक आकृतींचे आणि त्यांच्या वैशिष्टयांचे वर्णन केले आहे आणि तदनंतर वेदि कशा बांधायच्या ह्याचे विवरण आहे.  ह्यावरून शुल्बसूत्र हा शब्द निर्माण झाला आहे.  सर्व शुल्बसूत्रांमधून सर्वसाधारणपणे त्याच गोष्टी वेगवेगळ्या शब्दांमधून सांगितल्या आहेत.  आधुनिक शब्दात बोलायचे तर शुल्बसूत्रे ही वेदिनिर्माणाचे manual अथवा user-guide आहेत.  विशिष्ट आकारांच्या विटांचे काही पातळ्यांपर्यंत थर उभारून आणि त्यांना निरनिराळे आवश्यक आकार देऊन वेदि तयार होतात.  काही वेदी त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ अशा सोप्या आकारांच्या असतात तर काही त्याहून थोडया अवघड अशा तुल्यचतुर्भुज - Rhombus, तुल्यलंबक - Trapezium आणि अतुल्यलंबक -Trapezoid - अशा आकारांच्या असतात.  श्येन, कूर्म अशा प्राण्यांसारख्या दिसणार्‍या वेदीहि असतात.  त्यांचे क्षेत्रफळ आणि अशा क्षेत्रफळांचे एकमेकात संबंध हे निश्चित केले आहेत.  हे सर्व कार्य शास्त्रविहित मार्गाने करण्यासाठी लागणारे भूमितिज्ञान शुल्बसूत्रांमधून मांडण्यात आले आहे.

शुल्बसूत्रांमधील भूमितिज्ञान हे आज आपण शिकतो तशा प्रकारचे म्हणजे गृहीतकृत्ये आणि त्यांमधून तर्काने निघणारी प्रमेये आणि त्यांच्या सिद्धता अशा प्रकारचे नाही.  अमुक एक भौमितीय आकार कसा काढावयाचा हे एक स्वत:सिद्ध सत्य म्हणून मांडायचे अशी शुल्बसूत्रांची रचना आहे.  केलेल्या विधानाची सिद्धता किंवा ते तसे का ह्याबाबतचे कोठलेच विवेचन त्यात नाही. ह्याचे कारणे असे संभवते की शुल्बसूत्रे हा काही भूमितिशास्त्राचा ग्रंथ नाही.  त्यांचे स्वरूप यज्ञविधि करणार्‍या ऋत्विजांसाठीचे hand-manual अथवा user-guide असे आहे आणि म्हणून त्यात दिलेल्या सूचनांचे शास्त्रीय स्पष्टीकरण तेथे न मिळणे साहजिक आहे.

शुल्बसूत्रांमधील भूमितिज्ञान कसे होते ह्याची काही उदाहरणे आता पाहू. (जमिनीत मेखा - सूत्रांच्या भाषेत शंकु - उभ्या करून आणि त्यांना पुरेशा लांबीच्या रज्जूच्या दोन टोकांनी बांधून एकमेकांशी काटकोन करणार्‍या दोन रेषा कशा काढायच्या, तसेच वर्तुळ अथवा त्याचा चाप कसा काढायचा, चौरस वा आयत कसा काढायचा अशा स्वरूपाच्या प्राथमिक कृति येथे वगळून पुढे जाऊ.  काटकोन अथवा लंब ह्या संकल्पना स्पष्टपणे कोठे उल्लेखिलेल्या दिसत नाहीत पण दिलेल्या कृतींचा परिणाम तोच होतो.)

१)पायथागोरसच्या नावाने ओळखले जाणारे प्रमेय.

दीर्घचतुरस्रस्याक्ष्णयारज्जु: पार्श्वमानी तिर्यङ्मानी च यत्पृथग्भूते कुरुतस्तदुभयं करोति। तासां त्रिकचतुष्कयोर्द्वादशिकपञ्चिकयो: पञ्चदशिकाष्टिकयो: सप्तिकचतुर्विंशिकयोर्द्वादशिकपञ्चत्रिंशिकयो: पञ्चदशिकषट्त्रिंशिकयोरित्येतासूपलब्धि:। बौधायन १.१२.

(येथे दाखविलेले सूत्रांचे संदर्भ  http://hinduonline.co/digitalLibrary.html ह्या संस्थळावरील शुल्बसूत्रांच्या देवनागरी आवृत्तीवरून दाखविले आहेत.  ही आवृत्ति बर्‍याच जागी अशुद्ध दिसते पण पुस्तकांच्या digital आवृत्त्यांहून स्पष्ट असल्याने आवश्यक तशी शुद्ध करून तीच वापरली आहे. निरनिराळ्या पुस्तकांमधून सूत्रांचे अनुक्रमांक निरनिराळे दिसतात.)

सरळ अर्थ - आयताचा अक्ष्णयारज्जु ते दोन्ही करतो जे पार्श्वमानी आणि तिर्यङ्मानी वेगवेगळे करतात.  ३ आणि ४, १२ आणि ५, १५ आणि ८, ७ आणि २४, १२ आणि ३५, १५ आणि ३५ येथे ही उपलब्धि मिळते.

टिप्पणी - आयताच्या कर्णावर चौरस उभारला तर त्याचे क्षेत्र हे दोन बाजूंवर उभारलेल्या चौरसांच्या क्षेत्रांच्या बेरजेइतके असते.  (मुख्य ’प्राची’ म्हणजे म्हणजे पूर्वपश्चिम रेषा.  चौरसाची वा आयताची ’प्राची’ला समान्तर असलेली म्हणजेच तिच्या पार्श्वस्थानी असलेली बाजू म्हणजे ’पार्श्वमानी’.  तिला लंब करणारी करणारी रेषा ती ’तिर्यङ्मानी’ - चौरसाची वा आयताची आडवी बाजू आणि आयताच्या संदर्भात लहान बाजू.  भारतीय पद्धतीने पूर्वपश्चिम रेषा ही उभी - vertical - असते. पूर्व दिशा वर आणि पश्चिम दिशा खाली असते.  तिला लंबमान उत्तरदक्षिण रेषा ही आडवी असते.  त्यातहि उजवी बाजू ही दक्षिण आणि डावी ही उत्तर.  (आठवा - दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा - रामरक्षास्तोत्र आणि वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा - पांडुरंगाची आरती.)  ’अक्ष्णयारज्जु’ ह्याचा अर्थ चौरसाचा वा आयताचा कर्ण.

काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू - भुज आणि कोटि - ह्यांवरील चौरसांच्या क्षेत्राची बेरीज ही कर्णावरील चौरसाच्या क्षेत्राइतकी ह्या पायथागोरसच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रमेयाचा तथ्यांश प्राचीन भारतीयांनाहि माहीत होता हे ह्या आणि पुढे दर्शविलेल्या शुल्बसूत्रावरून दिसते.  त्याची ’सिद्धता’ भारतात माहीत होती किंवा अशा सिद्धतेची आवश्यकता त्यांना भासली होती असा काही पुरावा आता उरलेला नाही पण तत्त्व माहीत होते हे निश्चित.  त्यांना हे कोठून मिळाले अथवा हे भारतातच कोणाला स्वतन्त्रपणे सापडले होते, भारतीयांपाशी हे ज्ञान केव्हापासून होते ह्याचाहि काही पुरावा उरलेला नाही पण त्याचा यज्ञविधींसारख्या बाबीत वापर केला जात होता ह्यावरून भारतीयांना हे स्वतन्त्ररीत्या जाणवले असावे असे मत बनारसच्या संस्कृत कॉलेजातील प्राध्यापक जॉर्ज थिबो ह्यांच्या On the Shulvasutras ह्या १८७५ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात व्यक्त करण्यात आले आहे.

२) दिलेल्या चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळाचा चौरस निर्माण करणे.

समचतुरस्रस्याक्ष्णयारज्जुर्द्विस्तावतीं भूमिं करोति । बौधायन १.९.

सरळ अर्थ - चौरसाचा कर्ण त्याच्या दुप्पट क्षेत्र निर्माण करतो.

टिप्पणी - समचतुरस्र म्हणजे चारहि बाजू समान असलेला आणि शेजारच्या बाजू एकमेकांस लंब असलेला चौरस.  अशा चौरसाचा कर्ण, ज्याला येथे ’अक्ष्णयारज्जु’ असे म्हटलेले आहे, हा बाजू मानून नवा चौरस उभारला तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या दुप्पट असते.

३) दिलेल्या चौरसाच्या तिप्पट क्षेत्रफळाचा चौरस निर्माण करणे.

प्रमाणं तिर्यग्द्विकरण्यायामस्तस्याक्ष्णयारज्जुस्त्रिकरणी। बौधायन १.१०.

सरळ अर्थ - रुंदी दिल्याप्रमाणे आणि त्याचा कर्ण आडवी बाजू अशा आयताचा कर्ण तीनपट देतो.

टिप्पणी - दिलेल्या चौरसाच्या बाजूएवढी तिर्यङ्मानी बाजू आणि त्याच्या कर्णाइतकी पार्श्वमानी बाजू असा आयत काढून त्याच्या कर्णावर नवा चौरस बेतला तर त्याचे क्षेत्रफळ मूळच्या चौरसाच्या तिप्पट असेल.  ’द्विकरणी’ म्हणजे ’दुप्पट करणारा’ म्हणजेच वर दाखविल्याप्रमाणे चौरसाचा कर्ण.  अशा कर्णाइतकी लांबी असलेली पार्श्वमानी बाजू आणि मूळच्या चौरसाच्या बाजूइतकी तिर्यङ्मानी बाजू असलेला आयत काढल्यास तिप्पट क्षेत्राचा चौरस मिळेल.

४) ह्याच मार्गाने पुढे जाऊन मूळ चौरसाहून चौपट, पाचपट इत्यादि कोठल्याहि पटीचे क्षेत्रफळ असलेला चौरस क्रमाक्रमाने करता येईल.

५) मूळ चौरसाच्या कोठल्याहि पटीइतके क्षेत्रफळ असलेला चौरस निर्माण करण्याचा आणखी एक सोपा मार्ग कात्यायन देतो.

यावत्प्रमाणानि समचतुरस्रस्यैकीकर्तुं चिकीर्षेदेकोनानि तानि भवन्ति तिर्यक् द्विगुणान्येकत एकाधिकानि त्र्यस्रिर्भवति तस्येषुस्तत्करोति। कात्यायन ६.७.

सरळ अर्थ - जितके चौरस एकत्र करावयाचे असतील तेथे आडवी बाजू (चौरसांच्या संख्येच्या) एकाने कमी, (दुसर्‍या बाजूची) दुप्पट (संख्येहून) एकाने अधिक असा जो (समद्विभुज) त्रिकोण त्याची उंची ते करते.

टिप्पणी - दिलेल्या चौरसाच्या ’न’ पट क्षेत्राचा चौरस निर्माण करावयाचा असेल तर असा एक (समद्विभुज) त्रिकोण काढा ज्याचा पाया मूळ चौरसाच्या बाजूच्या ’न - १’ पट असेल आणि एका बाजूची दुप्पट केल्यास ती दुप्पट मूळ चौरसाच्या बाजूच्या ’न + १’ पट असेल, म्हणजेच ती बाजू मूळ चौरसाच्या बाजूच्या ’(न + १)/२’ इतकी पट असेल.  अशा त्रिकोणाची उंची (इषु) इष्ट चौरस निर्माण करेल.


शेजारच्या आकृतीत अबक ह्या त्रिकोणात बक = न - १, अम हा ’बक’वर लंब.  त्यावरून अम = अब - बम = [(न + १)/२] - [(न - १)/२] = न.  त्रिकोणाची ही उंची अम ही बाजू धरून काढलेल्या चौरसाचे क्षेत्र ’न’ इतके असेल.  (येथे मूळ चौरसाची बाजू = १ एकक असे मानले आहे.)

६) चौरसाची जितकी पट करायची ती संख्या अन्य कोठल्या संख्येचा वर्ग असल्यास वापरायचा सोपा मार्ग.

द्विप्रमाणा चतु:करणी त्रिप्रमाणा नवकरणी चतु:प्रमाणा षोडशकरणी।  यावत्प्रमाणा रज्जुर्भवति तावन्तस्तावन्तो वर्गा भवन्ति तान्समस्येत्। कात्यायन ३.६, ३.७.

सरळ अर्थ - दुप्पट मापाने चार पट, तिप्पट मापाने नऊ पट, चौपट मापाने सोळा पट )क्षेत्र मिळते.)  रज्जु जितका पट तितक्या तितक्या पटीने चौरस.  त्यांना एकत्र करावे.
टिप्पणी - मूळ चौरसाच्या दुप्पट बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्र मुळाच्या चौपट असते, तिप्पट बाजून नऊ पट आणि चौपट बाजूने सोळा पट क्षेत्र मिळते.

७) एक संख्या दोन वर्गसंख्यांची बेरीज असेल तर त्या संख्येच्या पटीचा चौरस दिलेल्या चौरसापासून निर्माण करणे.

पदं तिर्यङ्मानी त्रिपदा पार्श्वमानी तस्याक्ष्णयारज्जुर्दशकरणी। एवं द्विपदा तिर्यङ्मानी षट्पदा पार्श्वमानी तस्याक्ष्णयारज्जुश्चत्वारिंशत्करणी। कात्यायन २.४, २.५.

सरळ अर्थ - आडवी बाजू एक पट, उभी बाजू तिप्पट तर कर्ण दहा पट निर्माण करतो.  तसेच आडवी बाजू दोन पट, उभी बाजू सहा पट. तर कर्ण चाळीस पट निर्माण करतो.

टिप्पणी - दिलेल्या चौरसाच्या बाजूच्या एक पट आडवी बाजू, तीन पट उभी बाजू असा आयत काढल्यास त्याच्या कर्णावरील चौरस मूळ चौरसाच्या दहा पट असेल.  दिलेल्या चौरसाच्या बाजूच्या दोन पट आडवी बाजू, सहा पट उभी बाजू असा आयत काढल्यास त्याच्या कर्णावरील चौरस मूळ चौरसाच्या चाळीस पट असेल.

८) वेगवेगळ्या क्षेत्रांच्या दोन चौरसांच्या बेरजेइतक्या क्षेत्राचा चौरस निर्माण करणे.

नानाचतुरस्रे समस्यन्कनीयस: करण्या वर्षीयसो वृध्रमुल्लिखेत्। वृध्रस्याक्ष्णयारज्जु: समस्तयो: पार्श्वमानी भवति। बौधायन २.१.

सरळ अर्थ - वेगवेगळ्या आकाराचे चौरस एकत्र करू पाहणार्‍याने लहान चौरसाच्या बाजूइतक्या अंतरावर मोठयाच्या बाजूवर खूण करावी.  खुणेपासून काढलेला कर्ण ही (इष्ट) एकत्रित (चौरसाची) बाजू आहे.


टिप्पणी - शेजारच्या आकृतीमध्ये अबकड हा छोटा आणि यरलव हा मोठा चौरस आहेत.  यर रेषेवर यम = अब इतके अंतर मोजा. मव ही बाजू धरून काढलेला चौरस हा इष्ट चौरस आहे कारण मव = यम + यव = अब + यव.


९) वेगवेगळ्या क्षेत्रांच्या दोन चौरसांच्या वजाबाकीइतक्या क्षेत्राचा चौरस निर्माण करणे.

चतुरस्राच्चतुरस्रं निजिहीर्षन्यावन्निजिहीर्षेत्तस्य करण्या वर्षीयसो वृध्रमुल्लिखेत्। वृध्रस्य पार्श्वमानीमक्ष्णयेतरत्पार्श्वमुपसंहरेत्। सा यत्र निपतेत्तदपच्छिन्द्यात्। छिन्नया निरस्तम्। बौधायन २.२.

सरळ अर्थ - एका चौरसातून दुसरा चौरस वजा करण्यासाठी ज्यास वजा करायचे आहे त्याच्या बाजूने मोठयाच्या बाजूवर खूण करावी.  मोठयातून (आयताकृति) भाग वेगळा काढावा.  त्याची उभी बाजू फिरवून (दुसर्‍या) उभ्या बाजूवर आणावी. ती जेथे पडेल तेथे खूण करावी.  ह्या खुणेने कार्य संपते.


 टिप्पणी - शेजारच्या आकृतीमध्ये अबकड हा छोटा आणि यरलव हा मोठा चौरस आहेत.  यर रेषेवर ’म’ बिंदु असा शोधा असा की यम = अब.  यमनल हा आयत पुरा करा.  ह्या आयताची मन ही बाजू ’न’भोवती फिरवून तिला यल रेषेवरील ’प’पर्यंत आणा.  आता पल =  पन - लन = मन - लन = यल - अब.  पव ही बाजू धरून निर्माण केलेला पपल चौरस हा इष्ट चौरस होय जो तुटक रेषेने दाखविला आहे.

१०) दिलेल्या आयताच्या क्षेत्राचा चौरस करणे.

दीर्घचतुरस्रं समचतुरस्रं चिकीर्षंस्तिर्यङ्मानीं करणीं कृत्वा शेषं द्वेधा विभज्य विपर्यस्येतरत्रोपदध्यात्। खण्डमावापनेन तत्संपूरयेत्। तस्य निर्हार उक्त:। बौधायन २.५.

सरळ अर्थ - आयताचा चौरस करू इच्छिणार्‍याने आडव्या रेषेला बाजू मानून (त्यावर चौरस करावा).  (आयताच्या) उर्वरित भागाचे दोन भाग पाडून (एकाला) उलटून बाजूस लावावे.  (उरलेला) खंड (चौरस) तुकडयाने भरून घ्यावा.  त्यांची वजाबाकी आधी सांगितली आहे.



टिप्पणी - शेजारच्या आकृतीत अबकड हा दिलेला आयत आहे.  त्याच्या डक ह्या तिर्यङ्मानीवर (आडव्या आखूड बाजूवर) यरकड हा चौरस उभारा.  उरलेल्या अबरय ह्या भागाचे अबनम आणि मनरय असे दोन समान भाग करा.  अबनम भागाला रमअक असे दक्षिण बाजूस उभे लावा. मूळचा आयत आता मनरअ१ब१ड अशा अनियमित आकारामध्ये संक्रमित झाला आहे.  त्याच्या कोपर्‍यावर उरलेल्या चौरस आकाराच्या खंडाला  नपअर असे नाव द्या.

आता मपबड हा चौरस आहे हे स्पष्ट आहे.  त्यामधून नपअर ह्या चौरसाला वजा केले असता उरलेल्या क्षेत्राचा चौरस कसा निर्माण करावयाचा हे वर क्र.९ मध्ये दर्शविले आहे.  त्या मार्गाने इष्ट चौरस निर्माण करा.

११) पार्श्वमानी तिर्यङ्मानीहून बरीच मोठी असल्यास अशा आयताचा चौरस करण्यासाठी सोपा मार्ग.

अतिदीर्घश्चेत्तिर्यङ्मान्याऽपच्छिद्यापच्छिद्यैकसमासेन समस्य शेषं यथायोगमुपसंहरेदित्येक: समास:। कात्यायन ३.३.

सरळ अर्थ - आयत अतिदीर्घ असल्यास तिर्यङ्मानीने (आखूड बाजूने) पार्श्वमानीवर शक्य तेवढे छेद घेऊन चौरस करावेत आणि त्यांचा वर क्र. ५ मध्ये दिल्याप्रमाणे एक चौरस करावा.  उरलेल्या आयताकृति भागाचा क्र. १० मध्ये दिल्याप्रमाणे चौरस करावा.  दोन्ही नवे चौरस क्र. ८ प्रमाणे जोडून इष्ट चौरस होईल.

१२) चौरसामधून त्याच क्षेत्राचा आयत करणे.

समचतुरस्रं दीर्घचतुरस्रं चिकीर्षंस्तदक्ष्णयाऽपच्छिद्य भागं द्वेधा विभज्य पार्श्वयोरुपदध्याद्यथायोगम्।
बौधायन २.३.

सरळ अर्थ - चौरसाचा (त्याच क्षेत्राचा) आयत करण्यार्‍याने कर्णाने चौरसाचे दोन भाग करून त्यामधील एका भागाचे दोन भाग करून ते (दुसर्‍या) भागाच्या दोन बाजूंवर बसवावे.



टिप्पणी - शेजारच्या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे यरलव ह्या चौरसाचे रव ह्या कर्णाने दोन भाग केले.  नंतर रलव ह्या भागाचे रलस आणि वलस असे दोन भाग केले. रलव उचलून यर शेजारी लावला, जेणेकरून रल ही रेषा यर ह्या रेषेवर पडेल.  तसेच वलस ह्या भागाचे केले.  आता अरवब हा आयत मिळाला ज्याचे क्षेत्र मूळ चौरसाइतके आहे.

१३)दिलेल्या चौरसाइतक्या क्षेत्राचा आणि एक बाजू दिलेली असणारा आयत निर्माण करणे.

अपि वै तस्मिँश्चतुरस्रं समस्य तस्य करण्यापच्छिद्य यदतिशिष्यते तदितरत्रोपदध्यात्। बौधायन २.४.

सरळ अर्थ - त्या (चौरसावर) (दिलेल्या बाजूचा) आयत निर्माण करून त्याच्या कर्णाने छेदून जे उरते ते इतरत्र ठेवावे.

ह्यावरून फारसा बोध होत नाही कारण सूत्र फार त्रोटक आहे.  बिभूतिभूषण दत्ता ह्यांनी सौन्दरराज आणि द्वारकानाथ यज्वा ह्या टीकाकारांच्या टीकांचा आधार घेऊन पुढील अर्थ दिला आहे.

’यावदिच्छं पार्श्वमान्यौ प्राच्यौ वर्धयित्वा उत्तरपूर्वां कर्णरज्जुमायच्छेत्।  सा दीर्घचतुरस्रमध्यस्थायां समचतुरस्रतिर्यङ्मान्यां यत्र निपतति तत उत्तरं हित्वा दक्षिणांशं तिर्यङ्मानीं कुर्यात्। तद्दीर्घचतुरस्रं भवति।’ ह्याचा अर्थ असा: (चौरसाच्या) दोन पार्श्वमानी बाजू पूर्वेकडे इष्ट लांबीपर्यंत वाढवून (आणि तो आयत पूर्ण करून) त्याची उत्तरपूर्व कर्णरेषा काढा.  ती कर्णरेषा चौरसाच्या तिर्यङ्मानी बाजूस जेथे छेदेल तेथून उत्तर बाजू सोडून देऊन दक्षिण बाजू ही (इष्ट आयताची) तिर्यङ्मानी बाजू करा.  असा (इष्ट)आयत निर्माण होईल.

प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे भारतीय पद्धतीने वर पूर्व, डावीकडे उत्तर आणि उजवीकडे दक्षिण हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.


शेजारच्या आकृतीवरून ही कृति स्पष्ट होते.  अबकड हा दिलेला चौरस आहे आणि म ही इष्ट आयताची लांबी आहे. (त्यामुळे म > अब हे स्पष्ट आहे.) डअ आणि कब ह्यारेषा अनुक्रमे य आणि र पर्यंत इतक्या वाढवा की यड = रक = म.  यरकड हा आयत पूर्ण करा.  त्याची यक ही कर्णरेषा अब ह्या अबकड चौरसाच्या तिर्यङ्मानीला जेथे छेदते त्या बिंदूस प असे नाव द्या.  लपव ही यडला समान्तर रेषा काढा, ती अशी की ल आणि व हे बिंदु अनुक्रमे यर आणि कड ह्या रेषांवर असतील.  लपव रेषेच्या उत्तरेकडील म्हणजे डाव्या बाजूचा भाग सोडला तर उरलेला आयत लरकव हा इष्ट आयत आहे.

हे विधान असे ताडून पाहता येते: त्रिकोण यलप + चौकोन लरबप + त्रिकोण पबक = त्रिकोण यपअ + चौकोन अपवड + त्रिकोण पकव.  आता त्रिकोण यलप = त्रिकोण यपअ  आणि त्रिकोण पबक = त्रिकोण पकव.  ह्यावरून चौकोन लरबप = चौकोन अपवड.  म्हणून चौकोन लरबप + चौकोन पबकव = चौकोन अपवड + चौकोन पबकव, म्हणजेच आयत लरकव = चौरस अबकड.

(भाग २ मध्ये पुढे चालू.  भाग २ मध्ये वर्तुळापासून चौरस बनविणे, ’२’ ह्या संख्येचे वर्गमूळ असे विषय असतील.)

आधार -
1) Ancient Hindu Geometry - Bibhutibhushan Datta,
2) The Shulvasutras - George Thibaut,
3) Ancient Indian Mathematics and Vedha - Laxman Vasudev Gurjar.

Wednesday, November 20, 2013

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

१९) क्लब रोड - जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), आनंदराव नायर मार्ग (लॅमिंग्टन रोड), मोहम्मद शहीद मार्ग (मोरलॅंड रोड) आणि मराठा मंदिर मार्ग (क्लब रोड) अशा चौकोनामध्ये सध्या मराठा मंदिर सिनेमा, रिजर्व बॅंक कॉलनी, एसटी आणि बेस्टचे बसडेपो आहेत तो चौकोन १९४७ सालापर्यंत भायखळा क्लबाने व्यापलेला होता.  १८३३ साली सुरू झालेला आणि केवळ युरोपीयनांसाठीचा हा क्लब मुंबईतील तशा सर्व अन्य क्लबांमध्ये सर्वांत exclusive  मानला जाई आणि त्याचे सदस्यत्व मिळवणे सर्वसामान्य युरोपीयनांनाहि अवघड होते.  त्याच्या नावावरून क्लब रोड हे नाव पडलेले आहे.  हे apertheid स्वातन्त्र्यानंतर टिकवणे अवघड जाईल ह्या विचाराने १९४७ साली तो विसर्जित करण्यात येऊन त्याची मालमत्ता विकण्यात आली.  १८८३ मध्ये टर्फ क्लब ची स्थापना होईपर्यंत घोडयांच्या शर्यती भायखळा क्लबच्या विस्तीर्ण मैदानावर होत असत.  ’भायखळा क्लब कप’ मुळे टर्फ क्लबमध्ये ह्याची आठवण अजून जागी आहे.  क्लब रोड आणि भायखळा क्लबची खालील चित्रे पहा:



२०) चिरा बझार - एके काळी गिरगाव रस्त्याचा हा भाग दगडी चिरे वापरून झाकलेला असल्याने हे नाव त्याला मिळाले.

२१) चर्नी रोड - शेपर्ड ह्यांनी ह्या रस्त्याच्या नावाचे स्पेलिंग Charni Road असे दाखविले आहे.  त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की हे कोणा साहेबाचे नाव नसून ह्याचा उगम देशीच दिसतो.  ह्या उगमाबाबत सार्वत्रिक समजूत अशी दिसते की गुरेचारणीची जागा म्हणून हे नाव जागेला पडले. हे सहज शक्य वाटले तरी ह्यास आधार कोठेच दिसत नाही.  मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब.पु.बा.जोशी हे म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले.  चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

२२) कुलाबा, Old Woman's Island, कुलाबा कॉजवे, अफगाण चर्च - शेजारी दाखविलेल्या मुंबईखालील मूळच्या
सात बेटांच्या नकाशात अगदी खाली कुलाबा आणि Old Woman's Island अशी दोन बेटे आहेत.  पैकी Old Woman's Island हे छोटे बेट आता उरलेलेच नाही कारण कुलाब्याला मुख्य मुंबईशी जोडणार्‍या कुलाबा कॉजवेने त्याला गिळून टाकलेले आहे.

Old Woman's Island ह्या नावाचा उगम कोठेच सापडत नाही पण कुलाबा ह्याचा उगम ’कोळ-भाट’ (कोळी लोकांची जागा) असा असावा असा तर्क गर्सन दा कुन्हा आणि एडवर्ड्स् ह्यांनी केला आहे.  मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये ह्या शब्दाचे मूळ अरबी असल्याचे दर्शवून त्याचा अरबी अर्थ ’समुद्रात शिरलेला जमिनीचा लांब तुकडा’ असा दाखविला आहे.  (कोकण किनार्‍यावरील कुलाबा गाव आणि मुंबईतील बेट ह्या दोहोंचा हा अर्थ मोल्सवर्थमध्ये दाखविला आहे.) एडवर्ड्स ह्यांच्या मते Old Woman's Island हे नावहि Island of Al-Omanis - Island of Deep-sea Fishermen अशा अर्थाच्या अरबी शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश आहे.

१७९६ सालामध्ये कुलाब्याचे बेट हा कॅंटोन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आला.  (अजूनहि कुलाब्याचा मोठा भाग सैन्यदलाच्या ताब्यात आहे त्याचा हा उगम.) मात्र तेथे जायला होडीचा वापर करावा लागत असे.  १८३८ मध्ये मधल्या Old Woman's Island चा पायरीसारखा उपयोग करून कॉजवेच्या मार्गाने कुलाबा मुख्य मुंबईशी जोडले गेले.

कुलाब्यात असलेले आणि १८४६ साली बांधलेले the Church of St John the Evangelist' हे ’अफगाण चर्च’ ह्या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. चर्चमधील एका स्मृतिलेखाप्रमाणे हे चर्च १८३८ च्या पहिल्या अफगाण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृतीला वाहिलेले आहे.
(संगमरवरी लेख)

२३) कॉटन ग्रीन - १९व्या शतकाच्या प्रारंभापासून पूर्वेला चीनकडे आणि पश्चिमेला इंग्लंड आणि युरोपकडे कपाशीची निर्यात हा मुंबईतील एक प्रमुख व्यवसाय झाला होता.  दक्षिण हिंदुस्तानात उत्पादन झालेली कपात निर्यातीसाठी मुंबईत जमा होई आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत तिला टाउन हॉलसमोरच्या मोकळ्या जागेत साठवत असत. हे पहिले ’कॉटन ग्रीन’. कॉजवेमुळे कुलाबा मुंबईस जोडला गेल्यानंतर आणि १८६७ साली बीबीसीआय रेल्वेने कुलाबा स्टेशन बांधल्यावर मुंबईत येणारी कपास साठवणीची नवे ’कॉटन ग्रीन’ ह्या स्टेशनाजवळ आणण्यात आले.  तेथे ते १९३० सालाच्या पुढेमागेपर्यंत होते.  रेल्वेने कुलाबा स्टेशन १९३० सालात बंद केले.  तदनंतर कापसाचा व्यापार तेथून हलून उत्तरेस हार्बर लाईनवरील ’कॉटन ग्रीन’ नावाच्या नव्या स्टेशनाच्या परिसरात आणि ’कॉटन ए़क्स्चेंज’ ह्या नव्या इमारतीजवळ गेला.  आता काळ अजून पुढे सरकला आहे आणि ह्या अलीकडच्या ’कॉटन ग्रीन’मध्ये आयातनिर्यात मुख्यत्वेकरून लोखंड आणि पोलादाची होत असते.  कुलाब्याचे कॉटन ग्रीन असे दिसत असे:


२४) कूपरेज - ’कूपर’ हे एका व्यवसायाचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.  कूपर हा व्यावसायिक लाकडापासून वस्तु आणि द्रव ठेवण्याची भांडी - बॅरल, बादली इत्यादि तयार करतो.  सैन्यासाठी लागणारे मासे, मांस ह्यासारखे खाद्यपदार्थ, बीअरसारखी पेये टिकून राहण्य़ासाठी ते मिठात खारवणे, वाळवणे आणि नंतर योग्य प्रकारच्या लाकडाच्या भांडयात साठवणे ही कामे कूपर्स करीत आणि ह्यासाठीची जागा किल्ल्याच्या आत होती.  कालान्तराने नाना प्रकारचे वास आणि दुर्गन्धि निर्माण करणारे हे काम किल्ल्याबाहेर करण्यासाठी बेटाच्या दक्षिण बाजूस अपोलो बंदराजवळ एक शेड बांधून कूपर व्यावसायिकांची तिकडे रवानगी झाली.  १७८१ साली बांधलेली ही शेड १८८६ पर्यंत त्या कामासाठी वापरात होती.  त्या शेडच्या मोकळ्या जागेला कूपरेज हे नाव लागले आहे.  शेजारच्या रस्त्यासहि तेच नाव मिळाले आहे.

२५) सी.पी.टँक रोड - फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग), अर्स्किन रोड (ब्रि.उस्मान मार्ग) आणि किका स्ट्रीट हे जेथे मिळतात तेथून सुरू होणार्‍या ह्या रस्त्याला कावसजी पटेल ह्यांनी बांधलेल्या तलावावरून हे नाव पडले आहे.  पारशी समजुतीनुसार मुंबईत येणारी पहिली पारशी व्यक्ति इंग्रजांपूर्वी पोर्तुगीज काळातच १६४० साली आली होती.  त्या व्यक्तीचे नाव दोराबजी नानाभाई.  पोर्तुगीज अधिकारी आणि स्थानिक कोळी वस्ती ह्यांच्यामधील दुवा असे काम ते करीत असत आणि मुंबई इंग्रज अमलाखाली गेल्यावरहि त्यांची ती जागा चालू राहिली.  दोराबजीचा मुलगा रुस्तुम ह्याने १६९२ मध्ये सिद्दीचे मुंबईवरील आक्रमण स्थानिक कोळी लोकांची सेना उभारून परतवून लावले आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईचे पाटिलकीचे वतन वंशपरंपरा देण्यात आले.  रुस्तुमचा मुलगा कावसजी पटेल ह्याने धर्मार्थ हेतूने जो तलाव १७८० साली बांधला त्यावरून कावसजी पटेल टॅंक रोड तेव्हापासून ओळखला जातो.  विहार आणि तुळशी तलावांचे पाणी मुंबईत पोहोचल्यावर आरोग्याच्या कारणासाठी मुंबईतील इतर बहुतेक तलावांप्रमाणे हाहि बुजवला गेला.  बुजवण्याचे निश्चित वर्ष उपलब्ध नाही.  खाली दर्शविलेल्या जुन्या नकाशात कावसजी पटेल टॅंक रस्ता आणि त्याच्या पश्चिम टोकाला त्याच नावाचा तलाव दिसत आहे.

२६) क्रॉस आणि एस्प्लनेड मैदाने - मुंबईची बेटे कंपनीच्या ताब्यात १६६८ साली आली तेव्हा सध्याची दक्षिण मुंबई स्थानिक लोकांच्या शेतांनी आणि नारळाच्या वाडयांनी भरलेली होती.  हे लोक बहुसंख्येने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले होते.  सध्याचे मरीन लाइन्स, मेट्रो सिनेमा, एल्फिन्स्टन कॉलेजसारखे भाग ’कवेल’ नावाच्या वस्तीने व्यापलेले होते.  (कवेल हा शब्द कोळीवाडा ह्याचे पोर्तुगीज रूप आहे.)  कंपनीच्या ताब्यात ही बेटे आल्यावर परकी आक्रमणापासून त्यांचा बचाव करण्यासाठी इंग्रजांनी तेथे समुद्राकडे तोंड करून असलेला किल्ला बांधला आणि त्याच्या पश्चिम बाजूस मजबूत भिंत, बुरूज, तोफा ठेवण्याच्या जागा इत्यादि बांधून ती बाजू बळकट केली.  ह्यातूनच १७६० च्या सुमारास इंग्रज वरिष्ठांना असे वाटले पश्चिमेकडील कवेल, त्यातील घरे आणि वाडया, त्यातील मजबूत दगडविटांच्या बांधणीचे चर्च (Nossa Senhora da Esperança, Our Lady of Hope) आणि त्याला संलग्न दफनभूमि ह्यांपासून किल्ल्याला धोका संभवू शकतो कारण कोणी शत्रूने त्या बाजूने बेटावर सैन्य उतरविले तर ते सैन्य ह्या सर्व वाडया आणि बांधकामांच्या आडोशाने किल्ल्यावर हल्ला करू शकेल.  परिणामत: कवेल गाव उठवून चर्च जमीनदोस्त करण्यात आले.  (ह्याच कारणासाठी तेथेच जवळ असलेले मुंबादेवीचे देऊळ उठवून त्याच्या सध्याच्या जागी बदलण्यात आले. चर्चला भुलेश्वरकडे नवीन जागा देण्यात आली.) अशा रीतीने किल्ल्याच्या पश्चिमेस एक मोठे मैदान निर्माण झाले.  नदी, समुद्र, तलाव अशांना लागून असलेल्या जागेस ’एस्प्लनेड’ म्हणतात म्हणून हे मैदान त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.  कालान्तराने एस्प्लनेड मैदानामधून उत्तर-दक्षिण असा रस्ता निघून त्याला ’एस्प्लनेड रोड’ असे नाव मिळाले.  पुढील काळात हा भाग श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा संध्याकाळी फेरफटका मारण्याचा भाग झाला, तसेच त्याच्या उत्तर बाजूकडे सैन्याच्या कवायतींची जागा होती.  ह्या सर्वाचे  सुंदर वर्णन दिनशा वाच्छा ह्यांनी केले आहे.  त्यांच्याच सांगण्यानुसार १८५७ मध्ये मुंबईत नेटिव सैन्यात धनत्रयोदशीच्या रात्री काही बंडाची हालचाल आहे असे कानावर येताच पोलिस कमिशनर फोर्जेट ह्यांनी तातडीने तपास करून कारस्थानाच्या दोन पुढार्‍यांना  ताब्यात घेतले आणि झटपट कोर्ट मार्शल भरवून त्यांना मृत्युदंड सुनावला.  नोवेंबरच्या एका दुपारी दोघा पुढार्‍यांना सैन्याच्या आणि रहिवाशांच्या उपस्थितीत तोफांच्या तोंडी बांधून उडवून देण्यात आले.  वाच्छा तेव्हा जवळच्याच एल्फिन्स्टन स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी शाळेतून घरी परतत असतांना हा प्रसंग पाहिला.

१७६०च्या आगेमागे निर्माण झालेले हे मैदान अजूनहि गजबजलेल्या दक्षिण मुंबईत आपले मोकळेपण टिकवून धरण्यात पुष्कळ प्रमाणात यशस्वी झाले आहे.  त्याच्या मध्यातून जाणार्‍या दक्षिणोत्तर अशा एस्प्लनेड रोडमुळे ह्या मैदानाचे दोन भाग झाले आहेत.  पैकी पूर्वेकडील भागास आझाद मैदान असे नाव अलीकडे मिळाले आहे.  पश्चिमेकडील भागास ’क्रॉस मैदान’ म्हणतात कारण जुन्या पोर्तुगीज चर्च आणि दफनभूमीचा अवशेष असा एक क्रॉस तेथे टिकून होता. दिनशा वाच्छा आणि दा कुन्हा ह्या दोघांनीहि हा मूळचा क्रॉस पाहिल्याची नोंद ते करतात.  १९४०-४५ पर्यंत तो तेथे असावा कारण दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी मुंबईत उतरून युद्धाकडे रवाना होणार्‍या इंग्लिश-अमेरिकन सैनिकांना मुंबईची तोंडओळख करून देण्यासाठी छापलेल्या एका पुस्तिकेत त्याचा उल्लेख मला आढळला.  सध्याहि ह्या मैदानात एक क्रॉस दिसतो पण तो अलीकडेच बांधण्यात आला आहे.

एस्प्लनेड रोडचे नाव नंतर बदलून ’महात्मा गांधी रोड’ असे झाले.  हे नामान्तर स्वातन्त्र्यापूर्वीच केव्हातरी झालेले दिसते कारण वर उल्लेखिलेल्या पुस्तकात त्याचा तसा उल्लेख आहे आणि त्यातील नकाशातहि हे नाव दाखविले आहे.  ब्रिटिशांनी देश सोडण्यापूर्वीच हा बदल कसा घडून येऊ शकला आणि तोहि ’महात्मा’ ह्या उपाधिसकट हे मला एक गूढ वाटत आहे!  हा नकाशा खाली दर्शवीत आहे.


२७) करी रोड स्टेशन - हे उपनगरी गाडयांच्या स्टेशनचे नाव म्हणून अजून टिकून आहे पण ज्या रस्त्यावरून हे नाव पडले त्या करी रोडला आता महादेव पालव मार्ग असे नाव मिळाले आहे.  सध्याच्या वेस्टर्न रेल्वेचा पूर्वावतार बॉंबे बरोडा ऍंड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) रेल्वे हिचे १८६५ पासून १८७५ पर्यंतचे एजंट सी.करी ह्यांचे नाव स्टेशन आणि रस्त्यास दिले होते.  जीआयपी, बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्यांची लंडनमध्ये उभारलेल्या होत्या आणि त्यांची प्रमुख कार्यालये तेथेच होती.  हिंदुस्तानात कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख करणार्‍या प्रमुख अधिकार्‍यास ’एजंट’ अशी उपाधि असे.  ह्या दोन रेल्वे कंपन्यांची बोधचिह्ने मला wiki.fibis.org ह्या संस्थळावर सापडली ती खाली दर्शवीत आहे.


२८) चौपाटी - जुन्या किल्ल्याच्या पश्चिमेस भराव घालून रेक्लमेशनची नवी जमीन तयार करण्यापूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी जवळजवळ सध्याच्या चर्चगेट स्टेशनपर्यंत पोहोचत असे आणि ह्या पाण्याचे चार वेगवेगळे भाग (channels) दिसत.  त्यावरून त्या भागाला चौपाटी हे नाव पडले.  ठाणे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असेच सातपाटी नावाचे मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे त्याची येथे आठवण होते.

२९) चर्चगेट आणि चर्चगेट स्ट्रीट - मुंबईच्या फोर्ट जॉर्ज किल्ल्याला उत्तरेकडे बझार गेट, दक्षिणेकडे अपोलो गेट आणि पश्चिमेस चर्च गेट असे तीन दरवाजे होते.  पैकी चर्चगेट हे साधारणपणे सध्याच्या हुतात्मा स्मारकापाशी (फ्लोरा फाउंटन) होते आणि जवळच्याच सेंट थॉमस कॅथीड्रलवरून त्याला हे नाव पडले होते.  चर्चगेटमधून येणार्‍याजाणार्‍या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे नाव होते.  गेट १८६० च्या सुमारास आवश्यकता न उरल्यामुळे पाडून टकण्यात आले.  रस्त्याला सध्या वीर नरिमन मार्ग असे नाव आहे.  चर्चगेटचे नाव आता उपनगरी गाडयांच्या स्टेशनच्या रूपाने उरले.  चर्चगेट स्ट्रीट आणि जुने चर्चगेट स्टेशन खाली दाखवत आहे. आहे.






३०) दादर, दादर बीबी आणि टीटी - ’दादर’ ह्या नावाचा उद्भव कसा झाला ह्याबाबत निश्चित अशी माहिती कोणाजवळच उपलब्ध नाही. अशी एक समजूत बरीच रूढ असल्याचे मी ऐकले आहे की दादरमधून जाणार्‍या  रेल्वे रुळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी आणि पादचारी लोकांच्यासाठी तेथे एक पूल आणि जिना - दादर - बांधण्यात आला आणि त्यावरून ह्या उपनगराचे नाव ’दादर’ असे पडले.  ही उपपत्ति स्वीकारार्ह वाटत नाही कारण मुंबईशी संबंधित म्हणून ’दादर’ हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मरठी-इंग्लिश शब्दकोषात सापडतो.  तेथे दिलेल्या त्याच्या चार अर्थांपैकी दोन असे आहेत: '3. A bridge.  4. A Bombay word.  A ladder-like and moveable stair-case.'

दादरमधून जुनी बीबीसीआय रेल्वे (पश्चिम रेल्वे) आणि जुनी जीआयपी रेल्वे ह्या दोघींचे मार्ग जातात.  त्यापैकी पश्चिम रेल्वेच्या पलीकडील भागाचे दादर बीबीसीआय ऊर्फ दादर बीबी हे नाव अजून लोकांच्या तोंडात टिकून आहे.  मुंबईमध्ये ट्रॅम होती तेव्हा दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ते म्यूजिअम (परळ-भायखळा-वीटीमार्गे) हा ट्रॅमचा प्रवास दीड आण्यामध्ये होत असे.  ३१ मार्च १९६४ ह्या दिवशी ह्याच मार्गाने मुंबईची शेवटची ट्रॅम धावली.  दादर टीटी म्हणजे सध्याचे खोदादाद सर्कल.

शेपर्ड ह्यांच्या मतानुसार ’मुंबईकडे जाणार्‍या रस्त्याची एक पायरी’ अशा अर्थी हे नाव रूढ झाले असावे.  ठाणे जिल्ह्यातील केळवे गावाच्या बाहेर असलेल्या कोळी वस्तीसहि ’दादर’ असेच कोळी बोलीमधे नाव आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे.

३१) धोबी तलाव - मुंबईची बेटे पोर्तुगीजांकडे असण्याच्या दिवसांत एका धोबी व्यक्तीने तेव्हाच्या ’कवेल’
नावाच्या वस्तीमध्ये आपल्या जमातीच्या लोकांसाठी एक तलाव खोदला होता आणि बांधणार्‍याच्या नवावरून त्याला धोबी तलाव असे नाव पडले होते. धोबी त्या तलावावर आपले कपडे धुण्याचे काम करीत असत.  १८३९ सालापर्यंत तलाव जुना होऊन गाळाने भरला होता आणि त्यावर्षीच्या पाण्याच्या दुष्काळामुळे तो जवळजवळ आटला होता  फ्रामजी कावसजी नावाच्या दानशूर पारसी व्यक्तीने रु ४०,००० खर्च करून तलाव स्वच्छ करून पुन: बांधून घेतला आणि सार्वजनिक उपयोगासाठी तो सरकारच्या हवाली केला. कालान्तराने विहारचे पाणी दक्षिण मुंबईत पोहोचू लागल्यावर अन्य तलावांप्रमाणे ह्याचीहि तितकीशी आवश्यकता उरली नाही आणि नंतर केव्हातरीच्या वर्षात तो बुजविण्यात आला. १८६२ साली ह्या तलावाच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍यावर फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूट उभारण्यात आली.  तिची इमारत ह्या तलावाचा काही भाग वापरून बांधली गेली आहे.  तलावाची आठवण आता पुढील मजकुराचा संगमरवरी लेखातून उरली आहे.  हा लेख फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूटच्या रस्त्यावरील भिंतीवर पाहायला मिळतो:

Framji Cowasji Tank
That tank was so called by the order of Government to commemorate the late Framji Cowasji's liberality in expending a large sum of money on its reconstruction in the year 1839.


पूर्वीच्या तलावाची जागा आता वासुदेव बळवंत चौकाने व्यापली आहे पण धोबी तलाव हे ह्या भागाचे नावहि वापरात आहे.




मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग १

सॅम्युएल टी. शेपर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने लिहिलेले 'Bombay Place Names and Street Names’ अशा नावाचे आणि आणि १९१७ मध्ये छापलेले एक पुस्तक माझ्यासमोर आले.  मुंबईच्या रस्त्यांची आणि जागांची २०व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात काय नावे होती आणि त्या नावांमागे काय इतिहास दडलेला आहे अशी बरीच मनोरंजक माहिती त्यामध्ये आहे.  बहुतेक माहिती दक्षिण मुंबई आणि जवळचे भायखळ्यासारखे भाग येथील रस्त्यांबाबत आहे कारण पुस्तकाच्या इंग्रज लेखकाचे राहणे-फिरणे ह्याच भागात होत असणार.  ह्या माहितीपैकी बारीकसारीक गल्ल्याबोळ सोडून सर्वसामान्यत: कोणाहि वाचकास परिचित वाटतील अशा माहितीचे संकलन करून एक लेखमालिका लिहिण्याचा विचार आहे आणि त्यातील पुढील लेख पहिला असून इंग्रजी आद्याक्षरे अ आणि ब इतकी त्याची व्याप्ति आहे.  लेखाची तयारी करतांना संदर्भासंदर्भाने अन्य पुस्तके, विशेषत: डॉ.जे.गर्सन दा कुन्हा ह्यांचे Origin of Bombay, एस.एम.एडवर्ड ह्यांचे The Rise of Bombay ही दोन पुस्तक आणि जालावरील समोर आलेली माहिती ह्यांचाहि उपयोग येथे करण्यात आला आहे.

शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे.  ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते.  पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते.  बर्‍याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते.  ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते.  ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे  ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच.  रुस्तुमजी पेस्तनजी करकारिया हे असेच एक पारशी माहितगार गृहस्थ.  ह्यांचीहि विशेष माहिती मिळत नाही पण ह्यांनी लिहिल्या बर्‍याच पुस्तकांचे त्रोटक उल्लेख गूगलशोधात दिसतात.  स्वत: शेपर्ड ह्यांनी लिहिलेल्या 'The Byculla Club 1833-1916' आणि 'Bombay' अशा नावांच्या अन्य दोन पुस्तकांचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसला.

पुस्तकातील माहिती येथे संकलित करतांना मी दोन चाळण्या लावलेल्या आहेत.  ब्रिटिश सत्तेखालील मुंबईतील हॉर्नबी, मेडोज, फ्रेअर अशी रस्त्यांची नावे स्वातन्त्र्योत्तर काळात बहुतेक बदलली गेली आहेत आणि त्या जुन्या नावांचा उल्लेख आताच्या वाचकाला बुचकळ्यात टाकतो.  रस्त्यांना नावे देणारे हे पूर्वकालीन प्रतिष्ठित कोण होते ह्याची माहितीहि शोधू पाहणार्‍यास सहज जालावर सापडते.  ह्या कारणांसाठी अशा रस्यांची नावे येथे वगळली आहेत.  जुन्या किल्ल्याच्या उत्तर भागातील भुलेश्वर-भायखळा-परळ अशा भागातील लहानसहान रस्ते त्या परिसराशी परिचय असणार्‍यांनाच माहीत असतात, इतरांना त्या त्या नावांवरून काहीच बोध होत नाही.  अशी नावेहि येथे वगळण्यात आली आहेत.  आजहि वापरात असलेल्या आणि मुंबईची सर्वसामान्य ओळख असणार्‍या व्यक्तीस माहीत असू शकतील अशाच स्थानांच्या वा रस्त्यांच्या नावांना ह्या संकलनात जागा दिली आहे.  मुंबईचे माहितगार वाचक ह्यामध्ये अजून भर घालू शकतील.

१) अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड आणि ऍन्स्टी रोड- खंबाला हिलवरील उच्चभ्रू वस्तीच्या अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे.  हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता.  जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७ वर हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.

मुंबईतील जुने प्रख्यात वकील टी.ई.ऍन्स्टी (१८१६-७३) ह्यांचे नाव ऍन्स्टी रोड ह्या रस्त्यास मिळाले आहे.

२) अलेक्झॅंड्रा, लॅबर्नम आणि सिरस (Cirrus) मार्ग - ह्या तिनांपैकी लॅबर्नम रोड प्रसिद्ध आहे आणि शेजारच्या चित्रात दिसत आहे. त्याच्याच जोडीला अलेक्झॅंड्रा आणि सिरस अशा नावाचे त्याला समान्तर असे दोन रस्ते होते.  हे तिन्ही रस्ते बॉंबे इंप्रूवमेंट ट्रस्टने ह्या भागाची नव्याने आखणी करतांना निर्माण केले आणि त्यांना तीन फुलझाडांची नावे दिली.  पैकी अलेक्झॅंड्रा आणि सिरस ही नावे कोठल्या फुलझाडांसाठी आहेत हे लवकरच विसरले गेले कारण ही फुलझाडे इतकी प्रसिद्धहि नव्हती.  स्वातन्त्र्यानंतरच्या नावे बदलण्याच्या लाटेत ह्या दोन रस्त्यांना वाच्छागांधी आणि काशीबाई नवरंगे ह्यांची नावे मिळाली.  (काशीबाई पं. रमाबाईंसारख्याच ख्रिश्चन शैक्षणिक चळवळीत होत्या आणि तो भाग ह्या कार्यासाठी आजहि प्रसिद्ध आहे.)  तिसर्‍याचेहि नाव बदलले जायचे पण लॅबर्नम म्हणजे अमलतास अथवा बहावा.  हे नाव कोठल्या साहेबाचे नाव नसून एका फुलाचे आहे हे वेळीच लक्षात आल्यामुळे तेवढे मात्र वाचले!



३) अपोलो गेट/बंदर - मुंबईच्या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या गेट आणि बंदराला हे नाव का पडले असावे ह्याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.  Bombay City Gazetteer Vol I मधल्या अंदाजानुसार जुन्या काळात ’पाल-पालव’ नावाच्या देशी नौका तेथे नांगरलेल्या असत त्यावरून हे नाव पडले असावे. गर्सन दा कुन्हा ह्यांनाहि हाच अर्थ जाणवतो.

४) ऍंटॉप हिल - ह्या नावाच्या उगमाबद्दल मतमतान्तरे आहेत.  रा.ब. जोशींच्या मते ’अंतोबा’ हे नाव मुंबईच्या जुन्या रहिवाशांमध्ये लोकप्रिय होते आणि ह्या टेकडीचा भाग कोणा अंतोबाच्या मालकीचा असावा.  नंतर पोर्तुगीज काळात हे सूत्र विस्मरणात जाऊन नावाचा कालान्तराने ’ऍंटॉप हिल’ असा अपभ्रंश झाला.

५) ऍश लेन, ओक लेन आणि टॅमरिंड लेन - तीन झाडांची नावे ह्या तीन छोटया रस्त्यांना मिळाली आहेत.  त्यांपैकी ओक लेन नक्की कोठे होती हे आता गूगलला समजत नाही, जरी त्या भागाच्या पोस्टमनांना ते माहीत असावे कारण अनेक जागांच्या पत्त्यांमध्ये अजूनहि तिचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसतो.  बाकीचे दोन रस्ते शेजारच्या चित्रात दिसत आहेत.


त्यांपैकी ऍश लेन ह्या नावाचे कोडेच आहे कारण त्या भागात कधीकाळी एखादे ऍशचे झाड असल्याचा उल्लेख नाही.  तसेच ऍश हे झाड मुंबईच्या दमट हवेत वाढू शकेल काय ह्याचीहि खात्री नाही.  टॅमरिंड लेन ह्या नावाला मात्र निश्चित कूळकथा आहे.लेनच्या थोडया उत्तरेला असलेल्या सेंट थॉमस कॅथीड्रल आणि बॉंबे ग्रीन ह्यांच्या मध्यावर एक चिंचेचे झाड होते.  तेथे आधी चिंचेची बरीच झाडे होती पण अखेर एकच उरले होते आणि त्याच्या सावलीत सार्वजनिक लिलाव चालत असत.  भाडयाने गाडया चालवणार्‍यांच्या शब्दात त्या जागेला ’आमली आगळ - चिंचेसमोरची जागा’ असे नाव होते. (’आमली आगळ’चा ह्याच अर्थाने उल्लेख गर्सन दा कुन्हा ह्यांच्या Origin of Bombay ह्या पुस्तकाच्या पान ५९ वरहि मिळतो.)  हे शेवटचे झाड नोवेंबर १८४६ मध्ये तोडले गेले.  त्याची आठवण आता केवळ रस्त्याच्या नावात उरली आहे.

६) बॅरक रोड/स्ट्रीट २९ आणि मरीन लाइन्स ९८.  शेपर्ड ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरक स्ट्रीट नावाचा रस्ता बझार गेट स्ट्रीटपासून मिंट रोडच्या मध्ये होता.  ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वत:चे नेटिवांतून भरती केलेले सैनिक होतेच पण ब्रिटनमधील राजाचे गोरे सैनिकहि त्यांचा खर्च देऊन कंपनी आपल्याकडे ठेवत असे.  अशा सैनिकांच्या राहण्याच्या जागेला ’King's Barracks' असे म्हणत असत आणि ही जागा किल्ल्याच्या भिंतीभाहेर एस्प्लनेड मैदानाच्या उत्तर अंगाला होती.  त्यांचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे.  सध्याच्या गूगलमधील नकाशात एक बॅरक रोड दिसत आहे पण तो बझार गेट स्ट्रीटच्या जवळपास कोठेच नाही.  अशी शक्यता वाटते की कंपनीच्या स्वत:च्या चाकरीत असलेल्या नेटिव सैनिकांच्या बॅरक्स येथे असू शकतील.

१८३० सालापर्यंत कंपनीची ’बॉंबे मरीन्स’ नावाची लढाऊ नौसेना होती आणि नंतर तिचेच वेळोवेळी इंडियन नेवी, रॉयल इंडियन नेवी असे नाव बदलत गेले.  ह्या नौसैनिकांच्या बॅरक्सवरून त्या भागाला मरीन लाइन्स हे नाव पडले आहे.


७) बॅंक स्ट्रीट - हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) येथून दक्षिणेकडे निघणारा रस्ता.  १८६५ च्या कापूस घोटाळ्यात जुनी बॅंक ऑफ बॉंबे बुडाली.  पुनर्रचित बॅंक ऑफ बॉंबे आपल्या नव्या इमारतीत १८६६ साली गेली.  ती इमारत ह्या रस्त्यावर होती आणि रस्त्याला ’बॅंक स्ट्रीट’ हे नाव मिळाले.  १९२१ साली नव्या इंपीरियल बॅंकेत ही बॅंक १९२१ मध्ये विलीन झाली.  इंपीरियल बॅंकेचा पुढचा अवतार म्हणजे सध्याची स्टेट बॅंक ऑफ इंडिया होय.



८) बाबुला टॅंक, बाबुला टॅंक रोड आणि डोंगरी जेल - बाबुला टॅंक नावाची जागा अजूनहि खाली दाखविलेल्या गूगल मॅपच्या तुकडयामध्ये भुलेश्वर-उमरखाडी भागात दिसत आहे पण तेथे सध्या कोठलाच तलाव नाही. शेजारच्या १८८२ सालच्या सर्वे नकाशात मात्र तलाव दिसत आहे आणि तलावाजवळ एक जेल आणि जेल रोडहि दिसत आहे.  त्यापैकी जेल आता तेथे नाही कारण त्याच्या जागी ’आशा सदन’ ही स्त्रियांसाठीचे आसराघर दिसत आहे.  कोल्हापूरचे कारभारी माधवराव बर्वे ह्यांनी गुदरलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निकाल विरुद्ध जाऊन मराठा आणि केसरीचे मुखत्यार अनुक्रमे आगरकर आणि टिळक ह्यांना १८८२ साली जेथे १०१ दिवस तुरुंगवासात काढावे लागले तेच हे डोंगरी जेल.  टिळकांची १९०८ साली मंडालेला पाठवणी झाली तेव्हाहि तेव्हाहि त्यांना पुण्याहून आणून येथेच ठेवले होते.  हा भाग थोडा उंचवटयाचा असल्याकारणाने त्यास डोंगरी म्हणत असत.

बाबुला टॅंक हा तलाव कोणा उदार व्यक्तीने १८४९ साली मुंबईकर रहिवाशांना पाणी पु्रवण्यासाठी  खोदला आणि १९०७ पर्यंत तो तेथे होता.  १९०७ साली तो बुजवण्यात आला आणि आता त्याचे नावच काय ते उरले आहे.  त्या भागात एकेकाळी असलेल्या बाभळीच्या झाडांवरून त्या तलावास हे नाव पडले असे दिसते.  १८८२ च्या नकाशात बाबुला टॅंक रोडहि दिसत आहे त्याचे आता रामचंद्र भट मार्ग असे नामकरण झाले आहे असे दिसते.




९) बाबुलनाथ मंदिर आणि बाबुलनाथ मार्ग - बाबुलनाथ मंदिराला ते नाव का पडले ह्याबद्दल आर.पी. करकारिया ह्यांचे मत असे की बाबुल नावाच्या एका सुताराने येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून देवळाचे नाव बाबुलनाथ असे पडले.  मंदिराच्या पुजार्‍यांचा ह्याला पाठिंबा आहे.  उलटपक्षी रा.ब. जोशी म्हणतात की बाबलजी हिरानाथ नामक सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील गृहस्थाने हे देऊळ निर्माण केले आणि त्याच्या नावावरून देवळास बाबुलनाथ म्हणतात.  मूळचे देऊळ १७८० चे असून सध्याचे देऊळ तेथेचे १९०० साली बांधण्यात आले आहे.  देवळावरून जाणारा बाबुलनाथ रस्ता इंप्रूवमेंट ट्रस्टने १९०१ साली बांधून कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिला.

१०) बापू खोटे स्ट्रीट आणि किका स्ट्रीट - बापू खोटे हे नाव हिंदु माणसाचे वाटते पण ह्या रस्त्याचे बापू खोटे हे त्या भागातील बर्‍याच मालमत्तांचे मालक असलेल्या एका कोंकणी मुसलमान व्यक्तीवरून पडले आहे.  ते प्रसिद्ध हकीमहि होते अशी समजूत आहे.  जगजीवन किका ह्यांच्याबद्दल नावापलीकडे काही अन्य माहिती उपलब्ध नाही.



११) बलराम रोड आणि बॅप्टी रोड -  बलराम रोडचे नाव रा.ब. येल्लप्पा बलराम (१८५०-१९१४) ह्या तेलुगु व्यक्तीवरून वरून पडले आहे.  त्यांचे राहते घर ह्या रस्त्यावर होते.  मुंबई-पुणे-कराची येथील इंग्रज सैन्याला घाऊक प्रमाणावर दूध पुरवण्याच्या व्यवसायातून ह्यांचे आजोबा आणि वडील मुंबई-पुण्याकडे आले.  येल्लप्पा ह्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून बांधकाम कंत्राटे घेण्यास सुरुवात केली.  १८५६-६० ह्या काळात विहार तलाव बांधल्यानंतर मुंबईला पाणी पुरविण्यासाठी शहरातील उंच ठिकाणांवर साठवणीचे तलाव बांधून तेथपर्यंत विहारचे पाणी पंपाने पोहोचविण्याची सोय करण्यात आली.  त्यांपैकी एक तलाव माझगाव भागातील भंडारवाडा टेकडीवर निर्माण करण्यात आला.  त्याचे बांधकाम  हे येल्लप्पा बलराम ह्यांचे विशेष काम मानले जाते.  (ह्या तलावाच्या जागी आता जोसेफ बॅप्टिस्टा उद्यान उभे आहे.)

बॅप्टी रोडचे नाव जेम्स बॅप्टी ह्यांच्यावरून पडले आहे.  ह्या भागात त्यांची पिठाची गिरणी आणि केकसाठी प्रसिद्ध असलेली बेकरी होती.

१२) बनाम हॉल लेन - रा.ब.जोशींचे राहते घर ह्या गल्लीतच होते.  तिच्या नावाबाबत त्यांनी पुरविलेली मनोरंजक माहिती अशी.  ह्या जागी प्रथम असलेल्या नारळांच्या वाडीमध्ये एक घर होते आणि त्याला ’वन महाल’ अथवा ’बन महाल’ असे ओळखत असत आणि त्या घरावरून गल्लीला बन महाल लेन असे ओळखत असत.  मुंबईचे कमिशनर ऍकवर्थ (१८९०-९५) हे रजेवर इंग्लंडला गेले होते आणि ते माल्वर्न गावात आपल्या ’बेनहम हॉल’ नावाच्या घरात राहात होते.  तेव्हा त्यांच्याकडे मुंबईहून काही पत्रे आली ज्यावर ह्यावर ह्या गल्लीचा पत्ता होता.  गल्लीच्या आणि त्यांच्या घराच्या नावातील साम्यामुळे त्यांना असे वाटले की ह्या गल्लीचे नाव बेनहम हॉलवरून ठेवावे.  त्यांची सूचना अर्थातच (!) मंजूर होऊन गल्ली ’बेनहम हॉल लेन’ झाली आणि त्याच नावाचे रूपान्तर देशी लोकांच्या बोलण्यात ’बनाम हॉल लेन’ असे झाले.

गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्‍याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे.  गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.

१३) बझार गेट स्ट्रीट, गनबो स्ट्रीट, अग्यारी लेन, बोरा बझार स्ट्रीट - १८६२ साली किल्ल्याची भिंत पाडण्याच्या
वेळी जमीनदोस्त झालेल्या दरवाज्याच्या नावावरून बझार गेट स्ट्रीट हे नाव पडले आहे.  किल्ल्याच्या उत्तर सीमेपलीकडे नेटिवांची वस्ती, म्हणजेच ’बझार’ (Black Town) आणि  भिंतीमध्ये बझार गेट नावाचे दार - खरे तर तीन दारे, एक मोठे व दोन लहान, नेटिव त्याला ’तीन दरवाजा’ म्हणत असत - होते.

गनबो स्ट्रीटबाबत दोन गोष्टी उपलब्ध आहेत.  एकीनुसार जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे एक पूर्वज गणबा ह्यांच्या मालकीची जमीन ह्या भागात होती आणि त्याचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे.  दुसरीनुसार गनबावा नावाच्या मुस्लिम फकिराच्या नावाची विहीर ह्या परिसरात होती. गनबावाच्या नावावरून रस्त्याला हे नाव मिळाले आहे.  गनबावाची विहीर नंतर केव्हातरी बुजविण्यात आली पण आपण ती पाहिली असल्याचे दिनशा वाच्छा ह्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणींमध्ये नोंदवले आहे.

अग्यारी लेन हे नाव माणकजी नौरोजी सेठ ह्यांनी १७३३ साली तेथे बांधलेल्या अग्यारीवरून आलेले आहे.  मुंबईच्या पूर्व किनार्‍याकडील ’नौरोजी हिल’ ह्या नावाने ओळखली जाणारी आणि ’डोंगरी’ अशा मूळच्या नावाची उंचवटयाची जागा ह्यांच्याच मालकीची होती. अग्यारीची पुनर्बांधणी १८९१ मध्ये करण्यात आली.

बोरा बझार स्ट्रीट हे नाव मुळात बोहरा बझार स्ट्रीट असे आहे आणि त्या भागात मोठया प्रमाणात राहणार्‍या बोहरा जमातीवरून ते नाव पडलेले आहे.

१४) बोरी बंदर - जी.आय.पी रेल्वे रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ह्या भागातील समुद्रातील खडक आणि वाळूचे उथळ भाग काढून टाकून रेल्वेच्या कामासाठी इंग्लंडहून येणारे जड लोखंडी सामान उतरवून घेण्यासाठी एक बंदर १८५२ साली तयार करण्यात आले आणि ह्या जागी मूळच्या असलेल्या रानवट बोरीच्या जंगलावरून त्याला बोरीबंदर असे नाव पडले.  नंतर ह्याच जागी रेल्वे गाडया सुटण्याचे जे स्टेशन तयार झाला त्यालाहि तेच नाव चालू राहिले.  नंतर येथेच एक नवी भव्य इमारत उभारून १८८७ साली ती वापरात आणण्यात आली आणि विक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या ५०व्या वर्षाच्या प्रसंगाने तिला विक्टोरिया टर्मिनस - VT - हे प्रसिद्ध नाव मिळाले.  तत्पूर्वी वापरात असलेल्या मूळच्या बोरीबंदर स्टेशनाचे चित्र येथे दर्शवीत आहे.

१५) बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते.  मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते.   (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai) .  ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात.  पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे.  दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’.  १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे.  Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे  Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही.  ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.

१६) ब्रीच कॅंडी, हॉर्नबी वेलार्ड आणि लव ग्रोव - १७७१ ते १७८४ ह्या काळात मुंबईचे गवर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी ह्यांनी लव ग्रोव ते महालक्ष्मी ह्या भागातून आत घुसणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी बांधलेल्या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव होते.  बांध अशा अर्थाच्या vallado ह्या पोर्तुगीज शब्दाचे हे इंग्रजी रूप आहे.  सध्या ह्याचे नाव लाला लजपतराय मार्ग असे आहे.  हा बांध घालण्याच्या पूर्वी भरतीचे पाणी आत शिरून पूर्वेकडील उमरखाडीपर्यंत खारी दलदल निर्माण करीत असे.  तिच्या जागी पक्की जमीन करण्याच्या विचाराने हॉर्नबी ह्यांना हा बांध घालावयाचा होता पण लंडनमधील कंपनीचे डिरेक्टर बोर्ड त्या खर्चाला तयार नव्हते.  आपल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसात हॉर्नबी ह्यांनी हे काम सुरू केले आणि बोर्डाकडून त्याला मिळालेली नामंजुरी मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ते पूर्णहि केले.

ह्याच्या उत्तरेला असलेला लव ग्रोव भाग तेव्हा मुंबईपासून दूर आणि एकान्ताचा असल्याने प्रेमी जोडप्यांना तेथे जाऊन निवान्तपणे प्रेमालाप करता येत असत ह्यावरून त्या भागास लव ग्रोव हे नाव पडले.  नंतर सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तीच जागा योग्य म्हणून निवडली गेल्याने तिच्या जुन्या रोमॅंटिक संदर्भाला काही अर्थ उरलेला नाही.

ब्रीच कॅंडी ह्या नावाच्या उगमाविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही पण महालक्ष्मीच्या देवळाबाहेरील समुद्र खडकाळ असल्याने त्या भागात समुद्रकिनारा तुटल्यासारखा होता म्हणून त्यास ’ब्रीच’ म्हणू लागले अशी उपपत्ति बहुतेक ठिकाणी दिलेली आढळते.  ’कॅंडी’चा संबंध ’खिंड’ ह्या मराठी शब्दाशी जोडला जातो.

१७) भायखळा - ह्या नावाचे दोन अर्थ सुचविण्यात आले आहेत.  अन्य लेखकांच्या आधारे गर्सन दा कुन्हा ह्या नावाचा उगम  बहावा - बावा (कुणबी भाषेत) - भाया (कोळी अपभ्रंश) आणि खळे (जागा) असा दाखवतात.  बहावा म्हणजे अमलतास, Cassia fistula.  येथे असलेल्या बहाव्याच्या झाडांवरून भायखळे हे नाव पडले असावे.  रा.ब.जोशी हा अर्थ अमान्य करीत नाहीत पण ’भाया नावाच्या व्यक्तीच्या मालकीची जागा’ असा अन्य अर्थ सुचवितात.